ज्वलंत आणि हृदयाला भिडणारा आशय, शेतकऱ्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणार चित्रपट ‘फास’!

| Updated on: Nov 27, 2021 | 2:04 PM

मराठी सिनेसृष्टीत नेहमीच ज्वलंत आणि ह्दयाला भिडणाऱ्या कथांवर चित्रपट बनत असल्याचं जगजाहीर आहे. या कारणामुळेच मराठी चित्रपट नेहमीच जगभरातील आघाडीच्या सिनेमहोत्सवांमध्ये बाजी मारताना पहायला मिळतात.

ज्वलंत आणि हृदयाला भिडणारा आशय, शेतकऱ्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणार चित्रपट ‘फास’!
Fas
Follow us on

मुंबई : मराठी सिनेसृष्टीत नेहमीच ज्वलंत आणि हृदयाला भिडणाऱ्या कथांवर चित्रपट बनत असल्याचं जगजाहीर आहे. या कारणामुळेच मराठी चित्रपट नेहमीच जगभरातील आघाडीच्या सिनेमहोत्सवांमध्ये बाजी मारताना पहायला मिळतात. याच वाटेने जात देश-विदेशातील जाणकार प्रेक्षक आणि समीक्षकांची दाद मिळवणारा ‘फास’ हा आगामी मराठी चित्रपट 4 फेब्रुवारी 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आजवर या चित्रपटाने देश-विदेशातील विविध नामांकित चित्रपट महोत्सवांमध्ये 130 पेक्षा अधिक पुरस्कारांवर आपलं नाव कोरण्यात यश मिळवलं असून, मराठी सिनेसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

ज्वलंत विषयावर भाष्य

सातत्याने वाढत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, निसर्गाचं असंतुलन व सरकारी धोरण यांचा शेतकरी व त्यांच्या कुटुंबांवर होणारा परिणाम या चित्रपटात पहायला मिळणार आहे. फ्रान्समध्ये झालेल्या ‘कान’ चित्रपट महोत्सवामध्ये स्क्रिनिंग झालेल्या ‘फास’चं जापान आणि पॅरिससारख्या देशांसह राजस्थान व नोएडासारख्या बऱ्याच ठिकाणी आयोजित होणाऱ्या चित्रपट महोत्सवांमध्ये कौतुक करण्यात आलं आहे.

मातब्बर कलाकार

उपेंद्र लिमये, सयाजी शिंदे, कमलेश सावंत, पल्लवी पालकर, गणेश चंदनशिवे, नामदेव पाटील, निलेश बडे, ज्ञानेश उंडगवकर, उमेश राजहंस, शरद काकडे, ईश्वर मोरे, पवन वैद्य, विनय जोशी, देवा पांडे, पूजा तायडे, तेजस्विनी, माधुरी भारती आणि श्रृतिका लोंढे या कलाकारांनी यात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. समाजाभिमुख कथानक आणि मातब्बर कलाकारांच्या अभिनयाचं नैसर्गिक सादरीकरण या ‘फास’च्या मुख्य जमेच्या बाजू आहेत. याला प्रसंगानुरूप गीत-संगीताची जोड देत चित्रपटाच्या कथेत मांडण्यात आलेला विषय प्रेक्षकांच्या मनापर्यंत अचूकपणे पोहोचवण्याचं काम करण्यात आलं आहे. रिअल लोकेशन्सवरील चित्रीकरण प्रेक्षकांना रोमांचक अनुभव देणारं ठरणार आहे.

वास्तवाची दाहकता दाखवणारं चित्रण

‘फास’ या शीर्षकावरूनच हा चित्रपट वास्तवतेची दाहकता दाखवणारा असल्याचं जाणवतं. याबद्दल दिग्दर्शक अविनाश कोलते म्हणाले की, या चित्रपटाची कथा-पटकथा लिहिताना विशेषतः शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडीत असणाऱ्या बारीक-सारीक मुद्दयांचा अत्यंत बारकाईनं आणि चिकित्सक बुद्धीनं अभ्यास करण्यात आला आहे. मनोरंजनाचं माध्यम हे समाजातील वास्तव दाखवण्याचं काम करणारं असल्याचंही ‘फास’ या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल.

अनेक पुरस्कारांवर कोरले नाव!

मनोरंजनाला सामाजिक जाणिवेची जोड देऊन ‘फास’ चित्रपट बनवण्यात आला असून, देश-विदेशातील विविध चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारल्यानंतर आता हा चित्रपट रसिक दरबारी सादर करताना चित्रपटाच्या संपूर्ण टीमला अत्यंत आनंद होत असल्याची भावना अविनाश कोलते यांनी व्यक्त केली आहे. ‘फास’ची कथा व संवादलेखन माहेश्वरी पाटील चाकूरकर यांचे असून पटकथा अविनाश कोलते यांनी लिहिली आहे. कॅमेरामन रमणी रंजन दास यांनी या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी केली असून अपूर्वा मोतीवाले व आशिष म्हात्रे यांनी संकलन केलं आहे. गीतकार अमोल देशमुख यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार ऍलन के. पी. यांनी संगीत दिलं आहे. कला दिग्दर्शन संतोष समुद्रे यांनी केलं आहे.

“माँ एंटरटेनमेंट’’ प्रस्तुत माहेश्वरी पाटील चाकूरकर निर्मित ‘फास’ हा चित्रपट समाजातील सद्यस्थितीवर भाष्य करणारा आहे. नरेश पाटील, पल्लवी पालकर, दयानंद अवरादे, बसवराज पाटील, अनिल पाटील, वैशाली पद्देवाड हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. अविनाश कोलते यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाद्वारे अतिशय महत्त्वाच्या मुद्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा :

Aai Kuthe Kay Karte | जुनं प्रेम की फक्त मैत्री? अरुंधती-आशुतोषच्या भेटीगाठींना देशमुख कुटुंबाचा विरोध!

काळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये मौनी रॉयच्या कातीलाना अदा, फोटो पाहून चाहत्यांच्या नजराही खिळल्या!