
बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेत्री मुमताज यांनी 1974 मध्ये करिअरच्या शिखरावर असताना बिझनेसमन मयूर माधवानी यांच्याशी लग्न केलं. लग्नानंतर त्यांनी अभिनयक्षेत्रात काम करणं सोडून दिलं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्या आंतरधर्मीय लग्न आणि हिंदू धर्माच्या विविध पैलूंबद्दल मोकळेपणे व्यक्त झाल्या. मुमताज या मुस्लीम असून त्यांनी हिंदूशी लग्न केलं आहे. जन्मापासून मुस्लीम असूनही हिंदू देवी-देवतांवर खूप श्रद्धा असल्याचं त्यांनी मान्य केलं. ‘सितारों का सफर’ या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, “मला भगवान शंकर आणि श्रीकृष्ण प्रिय आहेत. मुस्लीम असूनही माझी त्यांच्यावर फार श्रद्धा आहे. घराबाहेर पडतानाच मला एक गणपतीची मूर्ती दिसते, तिथेही मी नेहमी पाया पडते.”
या मुलाखतीत मुमताज आंतरधर्मीय लग्नाबद्दलही व्यक्त झाल्या. “मी आणि माझ्या बहिणीने हिंदू धर्मातच लग्न केलं आहे आणि आम्ही दोघंही आपापल्या संसारात खुश आहोत. मला दोन्ही धर्मांवर विश्वास आहे. माझे पती माझी खूप काळजी घेतात. मला समजत नाही की लोक हिंदू आणि मुस्लीम यांच्यात विभाजन का करतात? मला त्यावर अजिबात विश्वास नाही. मी कायम हेच सांगत आले आहे की मी आणि माझ्या बहिणीने हिंदू पुरुषांशी लग्न केलं असून आम्ही दोघी खुश आहोत. मुस्लिमांमध्ये अनेकदा पुरुष तीन किंवा चार वेळा लग्न करून आपल्या पत्नीला सोडून देतात. याने मुस्लीम हिंदूंपेक्षा चांगले कसे होतात?”
“कोणत्याही पुरुषाने तीन किंवा चार वेळा लग्न करु नये. मी स्वत: मुस्लीम असून म्हणेन की हे चुकीचं आहे. एका पत्नीला ठेवणं आणि मग दुसरं लग्न करणं, मग तिसरं करणं. तुम्ही कधी विचार केला का की, नात्यात महिला किती अधिकार गाजवणाऱ्या असतात? हे एक असं नातं आहे, जिथे प्रत्येक महिला अधिकार गाजवणारी असते. मग एकीला सोडून दुसरीशी लग्न करणं, हे कसं योग्य आहे? हे पाप नाही का? या हिशोबाने मला हिंदू बरे वाटतात. सर्वसामान्यपणे ते एकदाच लग्न करतात. कधी कधी ते दुसऱ्यांदा लग्न करतात, परंतु याचा अर्थ असा नाही की ते अगदी सहजपणे एकीला सोडून दुसरीकडे जातात. हे चुकीचं आहे”, अशा शब्दांत त्या व्यक्त झाल्या.