
नोरा फतेही आणि संजय दत्त यांच्यावर चित्रित केलेल्या ‘सरके चुनर तेरी सरके’ या गाण्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. ‘केडी- द डेविल’ या कन्नड चित्रपटातील हे गाणं प्रदर्शित झाल्यापासून त्यावर बरीच टीका होत आहे. या गाण्याचे बोल आणि त्यावरील कोरिओग्राफी अत्यंत अश्लील असल्याचा आरोप केला जात आहे. या आरोपांनंतर आता ‘नॅशनल ह्युमन राइट कमिशन’ने (राष्ट्रीय मानवाधिकार आयोग) नोटीस बजावली असून त्यानंतर युटयूब आणि इतर प्लॅटफॉर्म्सवरून हे गाणं काढून टाकण्यात आलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, वकील विनीत जिंदाल यांनी सेन्सॉर बोर्ड आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे गाण्याविरोधात औपचारिक तक्रार दाखल केल्यानंतर गाण्याला आणखी विरोध होऊ लागला. वकिलांनी या गाण्याविरोधात तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती.
“हे गाणं अत्यंत अश्लील, बीभत्स अभिव्यक्तींनी भरलेलं आहे”, अशा शब्दांत वकील जिंदाल यांनी टीका केली होती. असं असूनही हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. या गाम्याचे बोल अत्यंत आक्षेपार्ह आणि सार्वजनिकदृष्ट्या प्रदर्शनासाठी अयोग्य आहे, हे गाणं विशेषत: अल्पवयीन मुलांसाठी अत्यंत अनुचित आहे, अशी बाजू त्यांनी तक्रारीत मांडली होती. त्यांच्या तक्रारीत गीतकार रकीब आलम, दिग्दर्शक प्रेम, संगीतकार अर्जुन जान्या आणि गायिका मंगली यांचा समावेश होता. मिळालेल्या माहितीनुसार, या गाण्यासंदर्भात दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलकडे यापूर्वीच एक स्वतंत्र फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली होती.
आनंद ऑडिओकडून हे गाणं हिंदी, मल्याळम, तमिळ, तेलुगू आणि कन्नड अशा विविध भाषांमध्ये युट्यूबवर अपलोड करण्यात आलं होतं. सोमवारी हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर त्याचे बोल आणि कोरिओग्राफी पाहून अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. आता तक्रारीनंतर हे गाणं सर्व प्लॅटफॉर्म्सवरून काढून टाकण्यात आलं आहे.
‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांनी गाण्यावर आणि बॉलिवूडवर टीका केली आहे. “अश्लीलता, लक्ष वेधून घेण्यासाठी केलेले डावपेच याबाबतीत बॉलिवूडने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. संपूर्ण देश त्याचा निषेध करत आहे आणि त्यांना धारेवर धरत आहे. पण मला वाटत नाही की त्यांच्यात कसली लाज उरली आहे. अशा प्रकारच्या अश्लीलता आणि बीभत्सतेबाबत आणखी कडक भूमिका घेण्याची गरज आहे. कुटुंबासोबत टीव्ही पाहणंही आता कठीण झालं आहे. बॉलिवूडवर आता कडक जरब बसवावी लागेल”, असं त्या म्हणाल्या.