“मतांमुळे नव्हे तर घरच्यांमुळे..”; ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर पायल मलिकचा कोणावर आरोप?
बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर पायल मलिकने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती तिच्या एलिमिनेशनचं कारण सांगताना दिसतेय. कमी मतांमुळे नाही तर घरातल्यांमुळेच मी बाद झाले, असं पायल म्हणतेय.

‘बिग बॉस ओटीटी 3’च्या वीकेंड का वार एपिसोडमध्ये या सिझनचं दुसरं एलिमिनेशन पार पडलं. युट्यूबर अरमान मलिकची पहिली पत्नी पायल यावेळी बेघर झाली. प्रेक्षकांकडून कमी मतं मिळाल्याने पायलला बिग बॉसचं घर सोडावं लागलं, असं सांगण्यात आलं. मात्र आता घरातून बाहेर पडल्यानंतर सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत पायलने इतर स्पर्धकांवर निशाणा साधला आहे. या व्हिडीओमध्ये तिने तिच्या चाहत्यांचे आभार मानले आणि घरातून बाहेर पडण्यासाठी घरातलेच इतर स्पर्धक जबाबदार असल्याचं तिने म्हटलंय. पायलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये ती म्हणतेय, “सर्वांना हॅलो! तुम्हा सर्वांना धन्यवाद, मला इतकं प्रेम दिलं त्याबद्दल. मला खूप पाठिंबा दिला. तुम्हा सर्वांना ठाऊक असेल की मी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली आहे.”
या व्हिडीओत पायल पुढे म्हणते, “मला माहितीये की मी मतांमुळे बेघर झाले नाही. तर घरातल्यांमुळेच मला बाहेर पडावं लागलं. मला घरातल्यांनी नॉमिनेट केल्यामुळे मी बाहेर पडले. माझा खेळ चांगला होता. मी खऱ्या आयुष्यात जशी आहे तशीच तिथे वागत होती. तुम्हा सर्वांना हे माहीत असेलच. मला फक्त तुमची साथ हवी आहे.” गेल्या आठवड्यात घरातील प्रत्येक सदस्याने दोन-दोन स्पर्धकांना नॉमिनेट केलं होतं. यात सर्वाधिक मतं अरमान मलिकसह इतर सात स्पर्धकांना मिळाली होती. त्यात पायलचाही समावेश होता.
पायल तिचा पती अरमान मलिक आणि सवत कृतिका मलिक यांच्यासोबत बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. तिच्या एलिमिनेशनवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. हा निर्णय चुकीचा असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलंय. ‘हे योग्य नाही. दीपक, नेझी, मुनिषा आणि सना सुलतान बिग बॉसच्या घरात काय करत आहेत? हा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे’, असं नेटकऱ्यांनी लिहिलं आहे.
‘वीकेंड का वार’ एपिसोडमध्ये अनिल कपूरने जेव्हा अरमानला पायलच्या एलिमिनेशनविषयी विचारलं, तेव्हा तो म्हणाला, “मी तयार आहे. जर ती एलिमिनेट झाली, तर ती घरी जाऊन आमच्या चार मुलांचा सांभाळ करेल. जर ती बिग बॉसच्या घरात राहिली तर तिने एलिमिनेट होण्यासारखं काही केलेलं नाही.” त्यावर अनिल कपूर त्याला म्हणतात, “चित भी मेरी और पट भी मेरी”. म्हणजेच दोन्ही बाजूने आपलाच विजय होणार असल्याचं अरमानने म्हटलंय.