देशाला हादरवून सोडणाऱ्या रंगा-बिल्लाची कथा, ‘राख’ सीरिजची चर्चा; बॉबी देओलचा धक्कादायक अनुभव

ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकताच प्रदर्शित झालेल्या 'राख' या वेब सीरिजची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. रंगा-बिल्ला या कुख्यात आरोपींवर आधारित या सीरिजची कथा आहे. बॉबी देओलने रंगा-बिल्लाशी संबंधित त्याच्या लहानपणीचा किस्सा सांगितला आहे.

देशाला हादरवून सोडणाऱ्या रंगा-बिल्लाची कथा, राख सीरिजची चर्चा; बॉबी देओलचा धक्कादायक अनुभव
Rakh Series Review
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 15, 2026 | 12:11 PM

ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकतीच ‘राख’ ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या सीरिजमुळे सत्तरच्या दशकातील कुख्यात रंगा-बिल्लाची कहाणी ताजी झाली आहे. या सीरिजमध्य सोनाली बेंद्रे, अली फजल, राकेश बेदी आणि आमिर बशीर यांच्या भूमिका आहेत. 1978 मधल्या कुख्यात रंगा-बिल्लाच्या केसवर आधारित ही कथा आहे. या खटल्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं होतं. अभिनेता बॉबी देओलपर्यंतही याची झळ पोहोचली होती. दिल्लीतील गीता चोप्रा आणि संजय चोप्रा या भाऊबहिणीच्या अपहरण आणि हत्येच्या घटनेनं त्यावेळी देशभरातील पालकांमध्ये त्यांच्या मुलांच्या सुरक्षेविषयी भीती निर्माण केली होती.

कोण होते रंगा-बिल्ला?

रंगाचं खरं नाव कुलजीत सिंह होतं. तो ट्रक चालवायचा. नंतर त्याने टॅक्सी चालवायला सुरुवात केली होती. एके दिवशी त्याची भेट शाम सिंह नावाच्या एका व्यक्तीशी झाली होती. त्याच्याकडे रंगा कामाच्या शोधात गेला होता. त्याने रंगाची ओळख जसबीर सिंहशी करून दिली, जो पुढे बिल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला. पैशांसाठी रंगा आणि बिल्ला आधी लहानसहान चोऱ्या करू लागले होते. पण नंतर ते लवकरच मोठे अपहरणकर्ते बनले. त्यांनी लहान मुलांचं अपहरण करण्यास सुरुवात केली आणि त्यातून मोठी रक्कम उकळू लागले होते. 1978 साली या दोघांनी असा गंभीर गुन्हा केला होता, ज्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं होतं.

रंगा आणि बिल्ला यांनी नौदल अधिकारी मदन मोहन चोप्रा यांच्या दोन्ही मुलांचं अपहरण केलं होतं. या अपहरणादरम्यान बिल्लाने संजयवर चाकूने हल्ला केला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात गीता किंचाळू लागली तेव्हा वाटेत कोणीतरी गाडीत दोन मुलांना पाहून गाडीचा नंबर देऊन पोलिसांना कळवलं. मात्र तोवर फार उशीर झाला होता. रंगा आणि बिल्लाने संजय ठार मारलं आणि नंतर गीतावर बलात्कार केला. नंतर बिल्लाने गीताच्या मानेवर चाकूने वार केला, त्यात तिचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनं संपूर्ण देशाला हादरवून सोडलं होतं.

हा गुन्हा केल्यानंतर रंगा आणि बिल्ला जवळपास दोन आठवडे फरार होते. 8 सप्टेंबर 1978 रोजी दिल्ली जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढत असताना त्यांना अटक करण्यात आली होती. अखेरीस या दोघांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. 1982 मध्ये रंगा आणि बिल्ला यांना तिहार तुरुंगात फाशी देण्यात आली.

बॉबी देओलने एका पॉडकास्ट मुलाखतीत रंगा आणि बिल्लाशी संबंधित एक प्रसंग सांगितला होता. रंगा आणि बिल्लाने बॉबीच्या शाळेतील एका मित्राचं अपहरण केलं होतं. पण सुदैवाने तो त्यातून निसटला होता. “रंगा-बिल्लाने अपहरण केलेल्या सर्व मुलांपैकी तो सर्वांत नशीबवान ठरला. माझा मित्र रंगाच्या ताब्यात होता आणि पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचणारच होतं. रंगा पळून गेला आणि माझ्या मित्राला एका पानाच्या दुकानात सोडून गेला. त्या मित्राने रंगा आणि बिल्लाला माझं नाव सांगितलं होतं. जेव्हा वडील धर्मेंद्र यांना हे कळलं तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसला होता. त्यांनी मला घराबाहेर जाण्यास बंदी घातली होती. त्यामुळे मी सायकल चालवायलासुद्धा घरातच शिकलो”, असं बॉबीने सांगितलं.

‘राख’ या वेब सीरिजचं दिग्दर्शन प्रोसित रॉय यांनी केलं असून 12 जून रोजी ही सीरिज प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली.

Follow Us