Raja Shivaji: रितेशच्या ‘राजा शिवाजी’मध्ये सलमान खानची मोठी भूमिका; टीझरनंतर चर्चांना उधाण
Raja Shivaji : रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' या चित्रपटात अभिनेता सलमान खान अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अभिनेता रितेश देशमुखने गेल्या दहा वर्षांपासून जे स्वप्न पाहिलं, ते अखेर सत्यात उतरत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित त्याचा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट येत्या 1 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या टीझरने सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधलं आहे. रितेश देशमुख, जिनिलिया देशमुख, अभिषेक बच्चन, विद्या बालन, भाग्यश्री, बोमन इराणी, फरदीन खान, संजय दत्त, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर अशी हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील तगडी स्टारकास्ट यात पहायला मिळतेय. या टीझरवर नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत असतानाच अभिनेता सलमान खानच्या भूमिकेविषयी अनेकांनी कुतूहल व्यक्त केलं आहे.
‘राजा शिवाजी’ या चित्रपटात सलमान खानसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. यासाठी त्याने 2025 मध्येच शूटिंग पूर्ण केलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, तो या चित्रपटात जीवा महालाची भूमिका साकारणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धांमध्ये जीवा महाला यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. ते महाराजांचे सर्वांत विश्वासू अंगरक्षक आणि मराठा सैन्यातील सर्वांत कुशल योद्धे होते. त्यामुळे सलमानला या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. टीझरमध्ये त्याची झलक दाखवण्यात आली नसली तरी त्याची ही भूमिका आणि एकंदर लूक कसा असेल, हे जाणून घेण्यासाठी प्रचंड कुतूहल व्यक्त होत आहे.
‘हे हिंदवी स्वराज्य व्हावे, ही तर श्रींची इच्छा, दहा वर्षे एका महाकाय स्वप्नाला उराशी बाळगून ते सत्यात उतरवण्याचा प्रयत्न केला. लक्षात आलं.. छत्रपती शिवाजी महाराज नावाचं हे आकाश जितकं दिसतं त्यापेक्षा कितीतरी भव्य आहे. आम्ही पाहिलेल्या स्वप्नाची पहिली झलक तुमच्यासमोर ठेवताना मला अभिमान वाटतो आहे. आपला राजा, आपला अभिमान. आई जगदंबेचं स्मरण करून मोहिमेचा पहिला भंडारा उधळत आहे,’ असं लिहित रितेशने हा टीझर पोस्ट केला आहे. काहींना हा टीझर खूप आवडला आहे, तर काहींनी त्यातील कलाकारांबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत.
‘राजा शिवाजी’ हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असून त्यांच्या पराक्रम, स्वाभिमान आणि स्वराज्य स्थापनेच्या प्रेरणादायी प्रवासाचं भव्य चित्रण यात करण्यात आलं आहं. रितेश देशमुखनेच या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून त्यानेच छत्रपती शिवाजी महाराजांची मुख्य भूमिका देखील साकारली आहे.