
चेक बाऊन्स प्रकरणात अभिनेता राजपाल यादवला अखेर जामीन मंजूर झाला आहे. कर्ड फेडण्यात अपयशी ठरलेल्या राजपालने तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केलं होतं. माझ्याकडे पैसे नाहीत, मी एकटा पडलोय, माझा कोणी मित्र नाही.. असं म्हणत तो तुरुंग अधिकाऱ्यांसमोर भावूक झाला होता. त्यानंतर बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी त्याच्या मदतीसाठी पुढे सरसावले. सोनू सूद, सलमान खान, मिका सिंह, गुरमीत चौधरी, इंदरजीत सिंह यांनी त्याला आर्थिक मदत जाहीर केली. अशातच ज्या व्यक्तीने राजपाल यादवला कर्ज दिलं होतं, त्या व्यक्तीची प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.
2010 मध्ये राजपाल यादवने एम. एस. मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या माधव गोपाल अग्रवाल यांच्याकडून त्याच्या एका चित्रपटासाठी पाच कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. ‘अता पता लापता’ या चित्रपटाचं दिग्दर्शन राजपाल करत होता. परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला आणि त्यामुळे त्याला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला. व्याज, दंड, विलंबित देयकं यांमुळे थकबाकीची रक्कम जवळपास 9 कोटी रुपयांपर्यंत वाढली. कर्ज चुकवण्यासाठी त्याने कर्जदात्याला अनेक चेक्स दिले होते. परंतु हे चेक्स बाऊन्स झाले. त्यामुळे नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्यांतर्गत त्याच्याविरोधात फौजदारी कारवाई सुरू झाली.
माधव अग्रवाल यांनी इतरांकडून पैसे उधार घेऊन राजपालला कर्ज दिल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे राजपालनने नियोजित वेळेत कर्ज न फेडल्यामुळे त्यांनाही मोठा फटका बसला आहे. “राजपालने मला पर्सनल गॅरंटीसुद्धा दिली होती. हे कर्ज होतं, गुंतवणूक नाही. कारण गुंतवणुकीत पर्सनल गॅरंटी किंवा चेक नसतात,” असं त्यांनी स्पष्ट केलं. कर्ज दिल्यानंतर माधव यांनी तीन वर्षे प्रतीक्षा केली आणि त्यानंतर अखेर 2013 मध्ये कोर्टात दाद मागितली. माधव अग्रवाल यांनी राजपालच्या घरी जाऊन पैशांसाठी रडल्याचाही दावा केला.
राजपाल यादवला तुरुंगात पाठवून मला आनंद झाला नाही किंवा माझा आदर वाढला नाही. मी एक बिझनेसमॅन आहे आणि मला फक्त माझे पैसे परत हवे आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.