पैसे नव्हते म्हणून नाही तर..; राजपाल यादवने सांगितलं तुरुंगात जाण्यामागचं खरं कारण

अभिनेता राजपाल यादवने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तुरुंगात जाण्याबद्दल पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलं आहे. राजपाल म्हणाला, "माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मी जेलमध्ये गेलो नाही, तर.."

पैसे नव्हते म्हणून नाही तर..; राजपाल यादवने सांगितलं तुरुंगात जाण्यामागचं खरं कारण
राजपाल यादव
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 22, 2026 | 1:05 PM

अभिनेता राजपाल यादवने चेक बाऊन्स प्रकरणात तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केलं होतं. त्यानंतर देशभरातून आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतून अनेकांनी त्याची आर्थिक मदत केली. जामिनावर सुटल्यानंतर राजपालने विविध मुलाखतींमध्ये त्याची बाजू मांडली होती. आता पुन्हा एकदा त्याने तुरुंगात जाण्याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. परंतु यावेळी त्याने पैसे नसल्यामुळे तुरुंगात गेलो नसल्याचं म्हटलं आहे. “गेल्या 25 वर्षांपासून माझ्या गावापासून मुंबईपर्यंत अशी एकही व्यक्ती नाही, जिने मला पाठिंबा दिला नसेल. माझं फिल्म इंडस्ट्रीतील लांबलचक करिअरच याचा पुरावा आहे. या इंडस्ट्रीत मी 250 हून अधिक चित्रपट केले आहेत”, असं तो म्हणाला.

इतकी वर्षे इंडस्ट्रीत काम केल्यानंतरही राजपालकडे कर्ज फेडण्यासाठी पाच कोटी रुपये नव्हते का, असा सर्वसामान्य प्रश्न अनेकांना पडला होता. त्यावर उत्तर देताना त्याने पुढे सांगितलं, “हाच तर खरा प्रश्न आहे. ज्यादिवशी लोकांना ही गोष्ट समजेल, त्यादिवशी त्यांना संपूर्ण प्रकरण समजून जाईल.” चेक बाऊन्सचं प्रकरण वरकरणी जितकं साधं सोपं दिसतंय, तितकं ते नसल्याचं राजपालने स्पष्ट केलं. “मी पैसे नसल्यामुळे तुरुंगात गेलो नव्हतो. हा एक मोठा मुद्दा होता आणि सिद्धांतांचा प्रश्न होता. जर गोष्ट फक्त पाच कोटी रुपयांची असती, तर हे प्रकरण 2012 मध्येच मिटलं असतं. या प्रकरणामुळे माझं 17 ते 22 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे”, असं राजपाल म्हणाला.

“फिल्म इंडस्ट्रीत 100 चित्रपटांपैकी 20 चालतात आणि 80 फ्लॉप होतात. जर एखादा चित्रपट फ्लॉप होत असेल तर त्याचा अर्थ असा नाही की तुमच्यासोबत फसवणूक झाली आहे. अपयश हा बिझनेसचा एक भाग असतो आणि त्याकडे चुकीच्या पद्धतीने पाहू नये,” असं मत राजपालने या मुलाखतीत मांडलं. हा वाद मी सुरू केला नव्हता, परंतु माझ्यामुळे तो संपेल, असं म्हणत राजपालने न्यायव्यवस्थेबद्दल विश्वास व्यक्त केला.

‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत राजपालने तुरुंगात कसा वेळ घालवला, याविषयीचा खुलासा केला होता. त्याने सांगितलं की तुरुंगात इतर कैद्यांना जे जेवण दिलं जात होतं, तेच त्याला मिळत होतं. आपली बाजू मांडताना राजपाल यादवने स्पष्ट केलं की, “जर मी कोणाची फसवणूक केली असेल तर गेल्या दहा वर्षांत मला फिल्म इंडस्ट्रीत कामच मिळालं नसतं.”

Follow Us