त्यावेळी खूपच हिंदू-मुस्लीम..; प्रसिद्ध अभिनेत्याने नाकारलेली ‘छावा’मधील औरंगजेबची भूमिका, आता सांगितलं खरं कारण
'छावा' या चित्रपटात औरंगजेबाची भूमिका साकारून अभिनेता अक्षय खन्नाने प्रेक्षकांना चकीत केलं होतं. पहिल्यांदाच त्याला अशा भूमिकेत प्रेक्षकांनी पाहिलं होतं. परंतु अक्षय खन्ना या भूमिकेसाठी दिग्दर्शकांची पहिली पसंत नव्हता. त्यांनी त्याच्याआधी रणदीप हुडाला ऑफर दिली होती.

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ हा चित्रपट 2025 मध्ये प्रदर्शित झाला. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. यामध्ये अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची मुख्य भूमिका साकारली होती. तर औरंगजेबच्या भूमिकेतल्या अक्षय खन्नाने सर्वांनाच थक्क केलं होतं. मात्र या भूमिकेसाठी अक्षय खन्ना पहिली पसंत नव्हता. त्याच्याआधी अभिनेता रणदीप हुडाला औरंगजेबाच्या भूमिकेची ऑफर देण्यात आली होती. मात्र त्याने एका खास कारणामुळे या भूमिकेला नकार दिला होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने यामागचं कारण सांगितलं आहे.
‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत रणदीपने सांगितलं की दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी त्याला ‘छावा’ या चित्रपटातील भूमिकेसाठी संपर्क केला होता. त्यावेळी त्याची मानसिक स्थिती ठीक नव्हती. “मी लक्ष्मण उतेकर यांचा एक व्यक्ती आणि चित्रपट दिग्दर्शक म्हणून खूप आदर करतो, परंतु तरीही मला त्यांना नकार द्यावा लागला होता. त्यावेळी माझं वजन खूप कमी झालं होतं आणि मी टक्कल केलं होतं. कारण काही दिवसांपूर्वीच मी ‘सावरकर’ या चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली होती. त्याच्या पोस्ट-प्रॉडक्शनचं काम सुरू होतं. तेव्हाच मला छावाची ऑफर मिळली होती. मी आयपी कोर्ट केसमध्येही अडकलो होतो आणि संपूर्ण कथेत हिंदू-मुस्लीमचे मुद्दे अनेक होते. मला त्या मार्गावर जायचं नव्हतं. त्यानंतर जेव्हा माझ्या हाती ‘एथा’ या चित्रपटाची ऑफर आली आणि मला ती आवडली”, असं रणदीपने स्पष्ट केलं.
‘छावा’ या चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये पहायला मिळतं की आपल्याच जवळच्या लोकांनी केलेल्या फितुरीमुळे छत्रपती संभाजी महाराज मुघलांकडून पकडले जातात आणि त्यानंतर औरंगजेब त्यांना धर्मांतर करण्यास सांगतो. मात्र छत्रपती संभाजी महाराज धर्मांतर करण्यास नकार दिल्यानंतर औरंगजेब त्यांचा अतोनात छळ करतो. यानंतर पुढे औरंगजेबाचं काय होतं, हे चित्रपटात दाखवलं नाही. या चित्रपटात अभिनेता अक्षय खन्नाने क्रूर औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. त्याच्या दमदार अभिनयकौशल्याचं प्रेक्षक-समिक्षकांकडून प्रचंड कौतुक झालं होतं. या चित्रपटामुळे अक्षय खन्नाच्या करिअरला पुन्हा एकदा गती मिळाली. त्यानंतर त्याने ‘धुरंधर’मध्ये रेहमान डकैतची भूमिका साकारून प्रचंड प्रशंसा कमावली.