चेहरा सुन्न पडला, हालचाल बंद.. ‘रात्रीस खेळ चाले’च्या शेवंताला फेशिअल पॅरालिसिस, आजारपणामुळे हातातून गेली मोठी कामं

'रात्रीस खेळ चाले' या मालिकेत शेवंताची भूमिका साकारलेल्या अभिनेत्रीने तिचा धक्कादायक अनुभव सांगितला. या मुलाखतीच्या माध्यमातून कृतिकाने चाहत्यांसमोर तिच्या संघर्षाची नवी बाजू मांडली आहे.

चेहरा सुन्न पडला, हालचाल बंद.. रात्रीस खेळ चालेच्या शेवंताला फेशिअल पॅरालिसिस, आजारपणामुळे हातातून गेली मोठी कामं
रात्रीस खेळ चाले
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 19, 2026 | 9:35 AM

‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत शेवंताची भूमिका साकारलेली अभिनेत्री कृतिका तुळसकरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या आयुष्यातील एका कठीण काळाबद्दल खुसाला केला. शेवंताच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेलल्या कृतिकाला मालिकेनंतर अचानक आरोग्याच्या मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. तिला ‘बेल्स पाल्सी’ म्हणजेच चेहऱ्याच्या एका बाजूवर परिणाम करणारा फेशियल पॅरालिसिस झाला होता. चेहऱ्यावर परिणाम झाल्यामुळे अभिनयाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या अभिनेत्रीसमोर मोठं संकट उभं राहणं स्वाभाविक होतं. या परिस्थितीच्या तिच्या कामावरही परिणाम झाला आणि काही मोठे प्रोजेक्ट्स तिला सोडावे लागले, असं तिने सांगितलं.

अभिनयाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कोणत्याही कलाकारासाठी चेहरा आणि हावभाव हे महत्त्वाचे माध्यम असतात. अशा परिस्थितीत अचानक चेहऱ्याच्या हालचालींवर परिणाम होणं हा कृतिकासाठी मोठा धक्काच होता. मात्र या कठीण प्रसंगातून तिने स्वत:ला सावरलं आणि परिस्थितीचा सामना केला. याविषयी कृतिकाने सांगितलं, “रात्रीस खेळ चाले ही मालिका संपली आणि त्यानंतर मी हिंदीत काम करू लागले. 18 जानेवारी 2023 रोजी मी सकाळी उठले तेव्हा मला चेहऱ्याच्या उजव्या बाजूला काहीच हालचाल जाणवत नव्हती. ब्रश केल्यावर चूळ भरताना उजव्या बाजूने तोंडातून पाणी बाहेर यायला लागलं. माझा उजवा डोळासुद्धा व्यवस्थित काम करत नव्हता. मी डॉक्टरांकडे गेले तर त्यांनी मला गोळ्या दिल्या. पण तरीही मला वेगळंच वाटत होतं. अखेर मी मित्रांच्या सल्ल्यानुसार नंतर न्यूरोलॉजिस्टकडे गेले. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की याला ‘बेल्स पाल्सी’ (Bell’s palsy) म्हणतात. म्हणजेच चेहऱ्याचा पॅरालिसिस.”

“डॉक्टरांचं सगळं ऐकल्यावर माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. दुसऱ्या दिवशी सेटवर माझा डोळा बंदच होत नव्हता. डोळ्याजवळचा मेकअपच राहत नव्हता, सतत पाणी येत होतं. मला काही खाता येत नव्हतं, पिता येत नव्हतं. अखेर निर्मात्यांशी बोलून मी काम थांबवलं. कारण यातून मी कधी बरी होईन, मलाच माहीत नव्हतं. जवळपास तीन महिन्यांनंतर मी हळूहळू बरी होत गेले. पण सर्वकाही नीट व्हायला तीन वर्षांचा काळ लागला”, असं तिने पुढे सांगितलं. कृतिकाच्या आयुष्यातील हा अनुभव केवळ तिच्या आरोग्याशी संबंधित नव्हता, तर करिअरमध्ये आलेल्या अनपेक्षित ब्रेकचाही होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us