‘धुरंधर 2’च्या यशावर रितेश देशमुखची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला “तुम्ही हे गृहित धरू नका की..”
अभिनेता रितेश देशमुखने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत 'धुरंधर' आणि 'धुरंधर 2' या दोन्ही चित्रपटांच्या यशाबद्दल प्रतिक्रिया दिली. हिंदी चित्रपटसृष्टीला एका साच्यात ठेवता येणार नाही, असं त्यान म्हटलंय.

अभिनेता रितेश देशमुख सध्या त्याच्या आगामी ‘राजा शिवाजी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित या चित्रपटाचं दिग्दर्शनसुद्धा त्यानेच केलं आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत रितेश पहिल्यांदाच ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या दोन्ही चित्रपटांच्या यशाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला. हिंदी चित्रपटसृष्टीला एकाच साच्यात बंदिस्त ठेवता येणार नाही, असं मत त्याने यावेळी मांडलं. इतकंच नाही तर चित्रपट निर्मात्यांनी प्रेक्षकांच्या बदलत्या आवडीनिवडींबद्दल जागरूक राहिलं पाहिजे आणि फक्त एकाच प्रकारची कथाकथनाची शैली यशस्वी होईल, असं गृहित धरू नये, असंही त्याने म्हटलंय. जेव्हा कथा प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी असते, तेव्हा भारतीय प्रेक्षक विविध प्रकारच्या चित्रपटांसाठी नेहमीच खुला आणि व्यापक दृष्टीकोन ठेवतो, असं वक्तव्य रितेशने केलं आहे.
‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या या मुलाखतीत आदित्य धरच्या ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर 2’ या दोन्ही चित्रपटांच्या यशावर प्रतिक्रिया देताना रितेश म्हणाला, “मला असं वाटतं की आपण आपल्या आजूबाजूला होणाऱ्या बदलांविषयी खूप जागरुक असायला हवं. आपण या बदलांकडे डोळेझाक करू शकत नाही. धुरंधर किंवा धुरंधर 2 यांसारखी अप्रतिम गोष्ट, ज्यात एक वेगळं कथानक, कथा सांगण्याची वेगळी शैली, वेगळा दृष्टीकोन असतो, तेव्हा ती गोष्ट खरोखर यशस्वी ठरते. त्यामुळे अशा गोष्टींचं नेहमीच स्वागत आहे. तुम्हाला त्याबद्दल एक रोमांचकारी भावना वाटते.”
“एका फॉरमॅटच्या चित्रपटांच्या यशामुळे इंडस्ट्रीने इतर कथांकडे दुर्लक्ष करू नये. पण मला असं वाटतं की आपले प्रेक्षक खूप सुजाण आहेत. एखादी कथा खरंच चांगली असेल तर ते नक्कीच थिएटरमध्ये येऊन पाहतात आणि त्याचा आनंदही घेतात. फक्त याच प्रकारच्या कथा किंवा याच प्रकारच्या गोष्टी यशस्वी होतील असा विचार करणं खूप मर्यादेत राहिल्यासारखं होईल. कारण जेव्हा धुरंधर आला, तेव्हा तो वेगळा चित्रपट होता, जेव्हा सैय्यारा आला, तेव्हा तो एका वेगळ्या धाटणीचा चित्रपट होता. त्यामुळे जर तुम्ही खरोखर यशस्वी झालेल्या चित्रपटांकडे पाहिलं तर, या सर्वांनी स्वत:साठी मापदंड निश्चित केले आहेत. यातून हेच सिद्ध होतं की आपण व्यापक दृष्टीकोन ठेवावा”, असं मत रितेशने मांडलं आहे.