Raja Shivaji : 100 कोटी बजेटचा ‘राजा शिवाजी’, हॉलिवूडला टक्कर देणारं VFX; रितेशने केली कमाल
सोनाली नाईक, प्रतिनिधी: मराठी चित्रपटसृष्टी गेल्या अनेक दशकांपासून एका अशा चित्रपटाची वाट पाहत होती, जो तांत्रिकदृष्ट्या हॉलिवूडला टक्कर देईल आणि भावनिकदृष्ट्या प्रत्येक मराठी माणसाच्या काळजाला हात घालेल. रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट नेमकी हीच पोकळी भरून काढतो. १०० कोटींचे बजेट असलेला हा चित्रपट केवळ मराठीतला सर्वात महागडा चित्रपट नाही, तर अवघ्या महाराष्ट्राच्या दैवताची—छत्रपति शिवाजी […]

सोनाली नाईक, प्रतिनिधी: मराठी चित्रपटसृष्टी गेल्या अनेक दशकांपासून एका अशा चित्रपटाची वाट पाहत होती, जो तांत्रिकदृष्ट्या हॉलिवूडला टक्कर देईल आणि भावनिकदृष्ट्या प्रत्येक मराठी माणसाच्या काळजाला हात घालेल. रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट नेमकी हीच पोकळी भरून काढतो. १०० कोटींचे बजेट असलेला हा चित्रपट केवळ मराठीतला सर्वात महागडा चित्रपट नाही, तर अवघ्या महाराष्ट्राच्या दैवताची—छत्रपति शिवाजी महाराजांची एक देदिप्यमान गाथा आहे.
कथानक
चित्रपटाची मांडणी अत्यंत विचारपूर्वक करण्यात आली आहे. कथा सुरू होते १६२९ च्या त्या काळरात्रीपासून, जेव्हा दख्खनची भूमी परकीय आक्रमकांच्या टाचांखाली चिरडली जात होती. सुल्तान बुरहान निजामशहाच्या आदेशाने देवगिरीच्या (दौलताबाद) भर दरबारात महाराजांचे आजोबा, लखुजीराजे जाधव यांची त्यांच्या पुत्रांसह कपटाने हत्या केली जाते. शिवबा जिजाऊंच्या उदरात असतानाच घडलेल्या या घटनेने इतिहासाला एक वेगळी कलाटणी दिली.
चित्रपट केवळ युद्ध दाखवत नाही, तर त्या मागचा विचार देखील मांडतो. आऊसाहेब जिजाऊंनी शिवबांना केवळ तलवार चालवायला शिकवलं नाही, तर अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याचे ‘बाळकडू’ दिले. स्वराज्याचे स्वप्न हे केवळ राजकारण नव्हते, तर तो रयतेचा श्वास होता. स्वराज्य म्हणजे काय, हे सांगताना चित्रपट आपल्याला त्या काळात घेऊन जातो जिथे अफज़ल खनन च्या स्वारी ने गावच्या गावं उध्वस्त होत होती आणि आया-बहिणींची अब्रू धोक्यात होती. अशा अंधकारातून शिवरायाँनी रयतेला कसे बाहेर काढले, याचा प्रवास म्हणजे ‘राजा शिवाजी’.
दिग्दर्शन
रितेश देशमुखवर या चित्रपटाच्या निमित्ताने दुहेरी जबाबदारी होती. एकीकडे बॉलिवूडमध्ये तो एक प्रतिभावान अभिनेता म्हणून स्थिरावलेला आहे, पण महाराष्ट्रात त्याची ओळख विलासराव देशमुखांचा मुलगा आणि या मातीचा पुत्र अशी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या संवेदनशील आणि विराट विषयाला हात घालताना ‘मराठा’ म्हणून त्याच्यावर प्रचंड दडपण असणार, हे उघड आहे. पण रितेशने या दडपणाचे रूपांतर एका संधीत केले आहे. त्याचे दिग्दर्शन अत्यंत स्पष्ट आणि प्रभावी आहे. त्याने कुठेही अतिरंजितपणा न करता इतिहासाचे गांभीर्य जपले आहे. विशेषतः युद्धप्रसंग आणि कूटनीती यांच्यातील समतोल त्याने उत्तम साधला आहे. रितेशने हे सिद्ध केले की, जेव्हा हेतू प्रामाणिक असतो आणि व्हिजन स्पष्ट असते, तेव्हा तुम्ही डोंगरही कापून रस्ता काढू शकता.
अभिनयाची जुगलबंदी
रितेश देशमुख (छत्रपती शिवाजी महाराज): महाराजांची भूमिका करणे ही कोणत्याही अभिनेत्यासाठी अग्निपरीक्षा असते. रितेशने महाराजांची शांतता, त्यांचे डोळे आणि त्यांच्या आवाजातील जरब यावर प्रचंड मेहनत घेतली आहे. पडद्यावर जेव्हा तो महाराजांच्या रुपात येतो, तेव्हा आपल्याला रितेश दिसत नाही, तर फक्त ‘राजा’ दिसतो. त्याच्या करिअरमधील हा सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स आहे.
अभिषेक बच्चन आणि संजय दत्त: हिंदीतील या दोन बड्या स्टार्सचा वापर केवळ मार्केटिंगसाठी केलेला नाही, तर त्यांच्या पात्रांना कथेत महत्त्वाचे स्थान दिले आहे. संजय दत्तची स्क्रीन प्रेजेंस थरकाप उडवणारी आहे, तर अभिषेक बच्चनने आपल्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. त्यांचे मराठी संवाद ऐकताना कौतुक वाटते की त्यांनी भाषेवर किती काम केले आहे.
विद्या बालन: विद्याने आपल्या भूमिकेत जी ‘धार’ आणली आहे, ती वाखाणण्याजोगी आहे. तिचे संवाद, तिची देहबोली आणि त्यातील आत्मविश्वास चित्रपटाची उंची वाढवतो.
सहाय्यक कलाकार: जितेंद्र जोशी, सचिन खेडेकर आणि जितेंद्र जोशी यांसारख्या कसलेल्या कलाकारांनी चित्रपटाला एक ठोस आधार दिला आहे. जेनेलिया देशमुख आणि बोमन इराणी यांच्या छोट्या पण महत्त्वपूर्ण भूमिका कथेला पुढे नेतात.
चित्रपटाच्या शेवटी सलमान खानची विशेष उपस्थिती हा प्रेक्षकांसाठी मोठा सुखद धक्का आहे. त्याची एन्ट्री होताच थिएटरमध्ये जो जल्लोष होतो, तो शब्दात मांडणे कठीण आहे.
तांत्रिक बाजू
सिनेमॅटोग्राफी (संतोष सिवन): संतोष सिवन यांनी आपल्या कॅमेऱ्याने महाराष्ट्राचा गड-किल्ले आणि सह्याद्रीच्या कडा अशा प्रकारे टिपल्या आहेत की त्या पाहताना डोळ्यांचे पारणे फिटते. प्रत्येक फ्रेम एका चित्रासारखी वाटते.
संगीत (अजय-अतुल): अजय-अतुल म्हणजे मराठी संगीताचा मानबिंदू. जेव्हा ‘जय शिवराय’ हे गाणे वाजतं किंवा युद्धाचा बॅकग्राउंड स्कोर सुरू होतो, तेव्हा अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाहीत. त्यांचे संगीत या चित्रपटाचा कणा आहे.
VFX आणि ॲक्शन: पहिल्यांदाच एका मराठी चित्रपटात आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हिज्युअल इफेक्ट्स पाहायला मिळतात.
शिवाजी महाराज हे केवळ एका ठराविक समाजाचे किंवा धर्माचे राजे नव्हते. ते ‘रैयतेचे राजा’ होते. त्यांच्या सैन्यात अठरापगड जातीचे लोक होते, मुस्लिम सरदार होते. स्वराज्य म्हणजे जिथे सर्वांना न्याय मिळेल, जिथे शेतकरी सुखी असेल आणि महिलांचा सन्मान केला जाईल, असा विचार होता. आजच्या काळात जेव्हा आपण जाती-पातीत विखुरले गेलो आहोत, तेव्हा महाराजांचा हा सर्वसमावेशक विचार पुन्हा एकदा समजून घेण्यासाठी हा चित्रपट पाहणे गरजेचे आहे.
उणीवा:
कोणतीही कलाकृती पूर्णपणे दोषमुक्त नसते. चित्रपटाचा कालावधी (Runtime) थोडा जास्त वाटू शकतो. उत्तरार्धात काही ठिकाणी संकलन (Editing) अधिक सुटसुटीत करता आले असते. मात्र, चित्रपटाचा एकूण आवाका इतका मोठा आहे की या लहान उणीवांकडे सहज दुर्लक्ष करता येते. अभिषेक बच्चन च मराठी समजू शकतों पण भाग्यश्री ने तिच्या मराठी वर मेहनत घ्यायला हवी होती.
का पाहावा हा चित्रपट?
‘राजा शिवाजी’ हा केवळ चित्रपट नाही, तर तो आपल्या स्वाभिमानाचा हुंकार आहे. आपल्या मुलांना आपला गौरवशाली इतिहास काय होता, आपले पूर्वज किती पराक्रमी होते आणि त्यांनी कोणत्या मूल्यांसाठी बलिदान दिले, हे सांगण्यासाठी हा चित्रपट पाहणे अनिवार्य आहे.
हा चित्रपट पाहताना तुमचे डोळे पाणावतील, छाती अभिमानाने फुगेल आणि रक्तामध्ये एक नवी ऊर्जा संचारले. ‘राजा शिवाजी’ च्या माध्यमातुन जियो स्टूडियो च्या ज्योति देशपांडे ना सोबत घेऊन रितेश आणि जेनेलिया देशमुखने च्या मुंबई फिल्म कंपनी ने मराठी चित्रपटसृष्टीला एक महागड़ी सुवर्णमयी संधी दिली आहे, सुगीचे दिवस परत आणण्याची, आता त्याचा उपयोग करायचा की नाही याचा कौल मायबाप प्रेक्षकांनी द्यायचा आहे.