Raja Shivaji: फक्त अभिमान नाही, डोळ्यांत पाणी, अंगावर काटा..; रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’च्या ट्रेलरवर प्रतिक्रियांचा वर्षाव
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित 'राजा शिवाजी' या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. या ट्रेलरवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. नेटकरी नेमकं काय म्हणत आहेत, ते जाणून घ्या..

अभिनेता रितेश देशमुखची मुख्य भूमिका असलेला बहुप्रतिक्षित ऐतिहासिक चित्रपट ‘राजा शिवाजी’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. रितेशनेच या चित्रपटाच्या दिग्दर्शन, अभिनय, लेखन आणि निर्मिती अशा सर्व जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. हा चित्रपट भारतातील सर्वश्रेष्ठ शूर योद्धे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आहे. बाळ शिवाजी ते राजा शिवाजीपर्यंतच्या प्रवासात ‘हिंदवी स्वराज्य’ स्वप्न उराशी बाळगून, ध्येयनिष्ठतेने प्रयत्न करण्याचा प्रेरणादायी प्रवास या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. विशेष म्हणजे, चित्रपटात प्रचलित नसलेल्या पण अत्यंत महत्त्वाच्या ऐतिहासिक पैलूंना नव्या दृष्टिकोनातून सादर करण्यात आलं आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहेत. ट्रेलरला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
‘पहिल्याच फ्रेमपासून हृदयाचा ठोका वाढायला लागला आणि प्रत्येक पुढच्या सीनसोबत अंगावर काटा येत गेला. छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा आपण लहानपणापासून ऐकत आलो, पण इतक्या जिवंतपणे, इतक्या भव्यतेने आणि इतक्या भावनिक ताकदीने ती पडद्यावर उभी राहताना पाहणं ही एक वेगळीच अनुभूती आहे. ट्रेलर पाहताना डोळ्यात आलेले अश्रू हे फक्त भावनेचे नव्हते, ते अभिमानाचे होते, कृतज्ञतेचे होते आणि त्या महान इतिहासाशी पुन्हा एकदा जोडले गेल्याचे होते,’ असं एकाने लिहिलं. तर हा ट्रेलर पाहताना फक्त अभिमान नाही, डोळ्यात नकळत पाणी येतं, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. जगभरात छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहगर्जना दुमदुमणार, अशी भावना नेटकऱ्यांनी व्यक्त केली. हा चित्रपट 1000 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई करणार, असाही विश्वास काहींनी व्यक्त केला आहे.
View this post on Instagram
राजा शिवाजी या चित्रपटाविषयी रितेश म्हणाला, “जेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलतो, तेव्हा त्यांच्या अलौकिक व्यक्तिमत्त्वाची आणि महानतेची व्याप्ती शब्दांत मांडणं खरोखरच कठीण होतं. त्यांच्याबद्दलचा आपला आदर, श्रद्धा आणि प्रेम व्यक्त करताना ते नेहमीच मनाच्या गाभाऱ्यातून उमटतं. गेल्या दहा वर्षांपासून मी ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट साकार करण्याचा प्रयत्न करत होतो. अखेर 2023 मध्ये जेव्हा आम्ही या प्रवासाची सुरुवात केली, तेव्हा मनात एक वेगळीच भावना होती. जणू खुद्द महाराजच सांगत होते, “आता तुझी वेळ आली आहे.” कारण केवळ स्वप्नं पाहून गोष्टी साकार होत नाहीत; त्यांना वास्तवात आणण्यासाठी भक्कम पाठिंबा आणि विश्वासाची गरज असते. मला पूर्ण विश्वास आहे की, आम्ही जे स्वप्न पाहिले होते, त्याचा मान राखण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला आहे.”
