महाराजांबद्दल बोलताना… रितेश देशमुखने मांडल परखड मत, नेमकं काय म्हणाला?

अभिनेता रितेश देशमुख हा सध्या त्याच्या राजा शिवाजी चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. दरम्यान, त्याने केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

महाराजांबद्दल बोलताना... रितेश देशमुखने मांडल परखड मत, नेमकं काय म्हणाला?
रितेश देशमुख
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: May 10, 2026 | 10:26 AM

गेल्या काही दिवसांपासून राजा शिवाजी हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटात रितेश देशमुख मुख्य भूमिकेत आहे तसेच त्याने या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनही केले आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. तसेच काहींनी या चित्रपटावर टीका केली. “छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्याबद्दल बोलताना प्रत्येकाने आदर, श्रद्धा आणि भाषेची मर्यादा राखलीच पाहिजे,” अशा शब्दांत प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख याने शिवरायांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्यांना सुनावले आहे. सांगली दौऱ्यावर असताना प्रसारमाध्यमांशी बोलताना रितेशने केवळ महाराजांच्या सन्मानावरच नव्हे, तर महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षेवरही अत्यंत संताप व्यक्त केला.

“अशा घटना ऐकून रक्त सळसळतं”

महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांवर रितेश देशमुखने तीव्र शब्दांत आपला रोष व्यक्त केला. तो म्हणाला, ज्या मातीत आपला जन्म झाला, जिथे महिलांचा अनादर करणाऱ्यांना ‘चौरंग’ करण्याची शिक्षा दिली जायची, त्याच मातीत आज अशा घटना घडतात हे पाहून संताप येतो. अशा बातम्या ऐकल्या की रक्त सळसळतं आणि मनात आक्रोश निर्माण होतो.

कायद्यात बदल आणि कठोर अंमलबजावणीची मागणी

महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी रितेशने कायदा व्यवस्थेत बदल सुचवले आहेत:

फास्टट्रॅक कोर्ट: अशा प्रकरणांचे निकाल लवकरात लवकर लागण्यासाठी फास्टट्रॅक कोर्टाची मदत घेतली जावी.

कठोर शिक्षा: जगातील इतर अनेक देशांप्रमाणे आपल्याकडेही कायद्यात बदल करून अत्यंत कठोर शिक्षा अमलात आणली पाहिजे.

अंमलबजावणी: आपल्याकडे नियम आणि शिक्षा आहेत, पण त्यांची अंमलबजावणी वेगाने होणे गरजेचे आहे. जर गुन्हेगारांना तातडीने शिक्षा झाली, तरच समाजात त्याचा सकारात्मक परिणाम होईल.

“अभ्यास न करता महाराजांवर बोलू नका”

गेल्या काही काळापासून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल येणाऱ्या वादग्रस्त विधानांवर रितेशने थेट भाष्य केले. “महाराजांबद्दल अनेकदा अभ्यास न करता चुकीची वक्तव्ये केली जातात. महाराजांचे नाव घेताना किंवा त्यांच्या विषयावर बोलताना आपली श्रद्धा आणि आदर कायम असायला हवा. कोणीही मर्यादा ओलांडू नये,” असे आवाहन त्याने यावेळी केले. सांगलीतील या भेटीदरम्यान रितेशने मांडलेल्या या परखड भूमिकेचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, सोशल मीडियावरही त्याचे हे विधान व्हायरल होत आहे.

Follow Us