बाथरुम सीनमध्ये बळजबरी किस करत..; तेजस्वी प्रकाशच्या बॉयफ्रेंडवर अभिनेत्रीचा मोठा आरोप
अभिनेत्री सान्वी तलवारने करण कुंद्राबद्दल मोठा खुलासा केला आहे. वादग्रस्त किसिंग सीनबद्दल तिने बऱ्याच वर्षांनंतर मौन सोडलं आहे. एका मालिकेच्या शूटिंगदरम्यान सान्वीने करणच्या कानशिलात लगावली होती.

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री सान्वी तलवारने तिच्या कारकिर्दीतील सर्वाधिक चर्चेतल्या वादावर अखेर मौन सोडलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने अभिनेता करण कुंद्रासोबत काम करण्याचा तिचा अनुभव सांगितला. यावेळी तिने काही वर्षांपूर्वीच्या एका घटनेचा उल्लेख केला. ज्यावेळी ही घटना घडली होती, तेव्हाही त्याची प्रचंड चर्चा झाली होती. आता सान्वीने त्यावर मौन सोडत सेटवर किती अवघड परिस्थिती निर्माण झाली होती, हे स्पष्ट केलं. ‘टेली मसाला’ला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत सान्वीने असा दावा केला आहे की, करण कुंद्राला ती आवडत होती. “तो मला पसंत करत होता, मला त्याच्यात काहीच रस नव्हता”, असं सान्वी म्हणाली.
यावेळी सान्वीने कानशिलात मारल्याच्या घटनेविषयीही खुलासा केला. हा प्रसंग अनेक वर्षांपर्यंत चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला होता. सान्वीने स्पष्ट केलं की, शूटिंगदरम्यान काही सीन्समुळे तिला खूप अस्वस्थ वाटलं होतं. एका विशिष्ट बाथरुम सीनमुळे तिला अस्वस्थ वाटलं होतं. अखेर तिने त्याविषयी गप्प बसण्याऐवजी मदत घेण्याचा निर्णय घेतला होता. याविषयी ती पुढे म्हणाली, “मी त्यावेळी करण कुंद्राची तेव्हाची गर्लफ्रेंड अनुषा दांडेकरशी संपर्क साधला होता. मी तिला सेटवरील अस्वस्थ करणाऱ्या घटनेबद्दल सांगितलं. त्यानंतर अनुषा स्वत: सेटवर येऊ लागली आणि गोष्टींवर लक्ष ठेवू लागली होती.”
“मी खूप निराश होते. एके दिवशी माझा आणि करणचा एक किसिंग सीन होता. करणने दिग्दर्शकांनी सांगण्याआधीच मला किस केलं. हे त्याचं चुकलं होतं की नाही? जेव्हा दिग्दर्शकाने किसिंग सीनबद्दल काही सूचना किंवा इशारा दिलाच नव्हता, मग त्याने लगेच सीन करायला कशी सुरुवात केली, असा सवाल करत मी रागाच्या भरात थेट त्याच्या कानाखाली वाजवली होती. त्यावेळी तो तिथून निघून गेला. मग दहा-पंधरा मिनिटांनी तो परत आला आणि सर्वांसमोर त्याने मला मारलं. मुलाचा हात मुलीच्या हातापेक्षा खूपच जड असतो. त्याने मला इतक्या जोरात कानाखाली मारली की मी थेट जमिनीवर कोसळले. तेव्हा क्रू मेंबर्स, दिग्दर्शक किंवा टीममधील कोणीच मला कोणत्याही प्रकारे आधार दिला नव्हता”, असा खुलासा सान्वीने केला.
यावेळी तिने आपलं दु:ख व्यक्त करत सांगितलं, “करण कुंद्राने मला शिवीगाळ केली होती. त्याने माझ्या आईवडिलांनाही शिव्या दिल्या होत्या. त्यावेळी मी थेट माझी गाडी घेऊन घरी गेले. मला यापुढे कामच करायचं नाही, असं मला त्यावेळी वाटत होतं. त्यानंतर एकता कपूर मॅडमने करणच्या वतीने माझी माफी मागितली होती. त्यांनी मेसेजकडून मला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावलं होतं. मी त्यांचा खूप आदर करते. त्यांनी मला आश्वासन दिलं होतं की, तुला जे अपेक्षित आहे ते होईल, पण हा शो चालू राहिला पाहिजे. त्यानंतर मालिकेच्या दिग्दर्शकांना बदलण्यात आलं.”
