“त्या भीतीने झहीर माझ्याशी बोलायचाच नाही..”; सागरिका घाटकेचा खुलासा

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री सागरिका घाटगे तिच्या आणि झहीर खानच्या लव्ह स्टोरीबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. सुरुवातीला झहीर तिच्याशी मोकळेपणे बोलायला कचरायचा, असं सागरिकाने सांगितलं. त्यामागचं कारणही तसंच होतं.

त्या भीतीने झहीर माझ्याशी बोलायचाच नाही..; सागरिका घाटकेचा खुलासा
Sagarika Ghatge and Zaheer Khan
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 19, 2025 | 3:10 PM

अभिनेत्री सागरिका घाटगे आणि माजी क्रिकेटर झहीर खान यांच्या लग्नाला आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सागरिका झहीरसोबतच्या नात्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. “सुरुवातीला झहीर माझ्याबद्दल साशंक होता. त्यामुळे तो माझ्यापासून चार हात लांबच राहायचा”, असा खुलासा तिने केला. मात्र अभिनेता अंगद बेदीच्या मदतीने सागरिका आणि झहीर एकमेकांच्या जवळ आले. अखेर 2017 मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली. ‘बॉलिवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत सागरिका म्हणाली की आधी झहीर तिच्याशी बोलण्यास कचरत होता. सागरिकाबद्दल त्याच्या मनात एक प्रतिमा बनली होती, त्यामुळेच तो तिच्याशी बोलायला कचरायचा.

“आम्ही एकमेकांना भेटत होतो, पण त्यावेळी तो माझ्याशी मोकळेपणे बोलायचा नाही. कारण प्रत्येकजण माझ्याविषयी त्याला म्हणायचे की, तुला माहितीये का, ती तशी मुलगी आहे. याचा नेमका अर्थ काय होता हे मला माहीत नाही. पण कदाचित त्यांना असं म्हणायचं असेल की, तू या नात्याबद्दल गंभीर असशील तरच तिच्याशी बोल, अन्यथा काही अर्थ नाही. पण पहिल्याच भेटीत मी झहीरच्या स्वभावाने प्रभावित झाले होते. तो जेंटलमन असल्याचं मला जाणवलं होतं. सुरुवातीचा संकोचलेपणाचा काळ सोडला तर नंतर आम्ही एकमेकांशी मोकळेपणे बोलू लागलो आणि भेटू लागलो. याचं श्रेय मी अंगद बेदीला देईन. कारण त्याने आम्हा दोघांना जवळ आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे”, असं सागरिकाने सांगितलं.

सागरिका घाटगे ही ‘चक दे इंडिया’ या चित्रपटातून प्रकाशझोतात आली. 2017 मध्ये झहीर खानशी लग्नानंतर ती चित्रपटांपासून दूर गेली. मात्र सोशल मीडियाद्वारे ती सतत चाहत्यांच्या संपर्कात असते. सागरिका आणि झहीर यांचं आंतरधर्मीय लग्न असलं तरी दोघं मिळून ईद, दिवाळी, गुढीपाडवा यांसारखे सण-उत्सव एकत्र साजरे करताना दिसतात. त्याचे फोटोही ती इन्स्टाग्रामवर पोस्ट करते. याविषयी सागरिका एका मुलाखतीत म्हणाली होती, “ही गोष्ट आम्हा दोघांसाठी खूप संवेदनशील आणि खासगी आहे. ही गोष्ट आमच्या दोघांच्या आयुष्याचा भाग आहे. एक व्यक्ती म्हणून आम्हा दोघांसाठी या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आम्हा दोघांसाठी धर्म हा रोजच्या आयुष्यातील भाग आहे.”

Follow Us