समय रैनाच्या इंडियाज गॉट लेटेंट शोमुळे नवा वाद, काश्मिरी पंडितांवर भाष्य केल्याने संकट; प्रकरण काय?

'इंडियाज गॉट लेटेंट 2' च्या नव्या भागातील वक्तव्यामुळे स्टँडअप कॉमेडियन समय रैना पुन्हा अडचणीत आला आहे. भाजप नेते त्याच्यावर चांगलेच भडकले आहेत. नेमकं काय झालं ?

समय रैनाच्या इंडियाज गॉट लेटेंट शोमुळे नवा वाद, काश्मिरी पंडितांवर भाष्य केल्याने संकट; प्रकरण काय?
Samay Raina Controversy
| Updated on: Aug 29, 2026 | 7:02 PM

Samay Raina Indias Got Latent 2 : स्टँडअप कॉमेडियन समय रैना (Samay Raina) आणि वादांचं जुनं नातं आहे. आता तो पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटेंट 2’ या शोच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये काश्मीरी पंडित आणि बिहारी लोकांबाबत करण्यात आलेल्या कथित विनोदावरून वाद निर्माण झाला. भारतीय जनता पक्षाचे नेते राम कदम यांनी समय रैनाच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत त्याचा तीव्र निषेध केला.  हे वक्तव्य म्हणजे काश्मीरी पंडित समाजाचा अपमान आहे, असं ते म्हणाले. काश्मीरी पंडितांविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरणं स्वीकारार्ह नसल्याचंही कदम म्हणाले.

‘काश्मीरी पंडित हे या देशाचा अविभाज्य भाग आहेत.दहशतवादी आणि पाकिस्तान-ISIच्या कारवायांमुळे त्यांना आपली घरं सोडून विस्थापित व्हाव लागलं. ज्या समाजाने इतकं दुःख आणि अत्याचार सहन केलेत, त्यांच्याविरोधात अशी आक्षेपार्ह भाषा वापरणं, हे या सभ्य समाजात स्वीकारलं जाऊ शकत नाही. हे अतिशय निंदनीय आणि आक्षेपार्ह आहे. ज्याने अशी टिप्पणी केली, त्या व्यक्तीने देशाची माफी मागितली पाहिजे,’ अशी मागणी कदम यांनी केली.

प्रसिद्धी मिळवण्यासाठी टार्गेट केलं जातं – राम कदम

‘ आम्ही कलाकारांच्या प्रतिभेचा आदर करतो. पण काही मर्यादा आणि सीमा असणं गरजेचं आहे. एखाद्याच्या मनातील श्रद्धा, भावना किंवा आस्था, त्यांना कोणी दुखावत असेल तर अशा वक्तव्याला कला म्हणता येणार नाही. समय रैना असो वा इतर कोणी कलाकार, प्रसिद्धी मिळवण्यासाठी एखाद्या समाजाला किंवा व्यक्तीला जाणीवपूर्वक टार्गेट करणं योग्य नाही. काश्मीरी पंडित किंवा बिहारी समाजाची खिल्ली का उडवली जाते? हा प्रसिद्धी मिळवण्याचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न असल्याचं दिसतं,’ अशा शब्दांत राम कदम यांनी टीका केली.

लेटेस्ट एपिसोडमध्ये नेमकं काय घडलं ?

‘इंडियाज गॉट लेटेंट 2’चा पाचवा एपिसोड 28 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. या भागात कॉमेडियन शैरन वर्मा पॅनेलमध्ये सहभागी झाल्या. त्या बिहारच्या आहेत. मात्र या शोमध्ये रोस्टिंगदरम्यान समय रैनाने शॅरेन यांच्याबद्दल बिहारचा संदर्भ देत विनोद केला. ‘शैरन एक बिहारी आहेत, ज्या कामाच्या शोधात मुंबईत आल्या आहेत. जस्ट बिहारी थिंग्स’ असं समय म्हणाला. त्यावर शैरन यांनी समय रैनाच्या  काश्मीरी पंडित असण्याचा संदर्भ देत टिप्पणी करत, “ कमीत कमी मी माझं राज्य माझ्या इच्छेने तरी सोडलं” असं प्रत्युत्तर दिलं.  या दोघांमध्ये झालेल्या संवादातील काही क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. त्यानंतर या वक्तव्यांवरून नवा वाद निर्माण झाला असून, समय रैना याच्यावर टीकाही होत आहे.

Follow Us