मोठी बातमी! ओबीसी समाजाच्या आंदोलनाला परवानगी नाहीच, मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय
राज्यभरातून ओबीसी समाजाचे बांधव 1 सप्टेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी येणार होते. मात्र, आझाद मैदान पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी देण्यास नकार दिला आहे.

ओबीसी समाजाच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. राज्यभरातून ओबीसी समाजाचे बांधव 1 सप्टेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी येणार होते. मात्र, आझाद मैदान पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी देण्यास नकार दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आंदोलनासाठी मल्लिकार्जुन पुजारी यांच्या नावाने पोलिसांकडे परवानगीचा अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी विविध कारणांचा हवाला देत आंदोलनाला परवानगी नाकारली आहे.
रुग्णालयांसह वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता
मुंबई पोलिसांनी दिलेल्या कारणांमध्ये आझाद मैदानाच्या आसपास असलेल्या रुग्णालयांच्या व्यवस्थेवर आंदोलनाचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मोठ्या संख्येने आंदोलक मुंबईत दाखल झाल्यास मुंबईची वाहतूक व्यवस्था विस्कळीत होऊ शकते, अशी शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे. याशिवाय आंदोलनामुळे परिसरात निर्माण होणारी गर्दी, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न आणि नागरिकांना होणारा संभाव्य त्रास यासह इतर कारणांचा विचार करून परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यभरातून ओबीसी बांधव मुंबईत येणार होते
1 सप्टेंबर रोजी आझाद मैदानात मोठ्या संख्येने ओबीसी समाजाचे बांधव एकत्र येऊन आंदोलन करणार होते. मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारल्याने आता आंदोलनकर्त्यांची पुढील भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आंदोलनाला परवानगी नाकारल्याच्या निर्णयावर ओबीसी समाजाच्या नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येते आणि आंदोलनाची दिशा काय ठरवली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
काय म्हणाले होते लक्ष्मण हाके?
ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी पाटस ते मुंबई महामोर्चा काढण्याची घोषणा केली होती. यानंतर सरकारने हाके यांच्याशी चर्चेची तयारी दर्शवली होती. यावर बोलताना हाके यांनी, ‘मागील वर्षी 2 सप्टेंबर रोजी काढलेला ओबीसी आरक्षणासंदर्भातील शासन निर्णय रद्द करणार का? तसेच सामाजिक मागास ठरवून मराठा समाजातील कुणबी घटकाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्याची प्रक्रिया रद्द करणार का? या दोन्ही मागण्या मान्य करणार असाल तरच आमच्या भेटीला या, असं विधान केलं होतं.
