Manoj Jarange : मराठे मुंबईला कधी निघणार? मनोज जरांगे पाटलांची सर्वात मोठी घोषणा
मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांनी या सर्व पार्श्वभूमीवर आपल्या मुंबईमधील आंदोलनाबाबत एक मोठी घोषणा केली आहे.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आता पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी यापूर्वीच 29 ऑगस्टपासून उपोषणाला बसणार असल्याचा इशारा सरकारला दिला होता. अखेर आजपासून आंतरवाली सराटीमध्ये त्यांच्या उपोषणाला सुरुवात झाली आहे. दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास आम्ही मुंबईमध्ये आंदोलन करू असंही त्यांनी म्हटलं होतं. आता याच संदर्भात मनोज जरांगे पाटील यांच्याकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. सरकाराला आजपासून 15 दिवस देत आहे, त्यानंतर बारा तारखेला महाराष्ट्रभरातील मराठा बांधव आंतरवाली सराटीमध्ये बोलावू, आणि मुंबईची तारीख जाहीर करू असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. मी आता मराठ्यांना मुंबईतून परत आणू शकणार नाही आणि मी पण परत येऊ शकणार नाही, असा निर्वाणीचा इशाराही यावेळी जरांगे पाटील यांनी दिला आहे.
सरकराने इथली रेंज कितीही कमी करू द्या, पण मराठे दिसणारच, मराठे झाकत नसतात. महाराष्ट्रातल्या, मुंबईतल्या मराठ्यांनी आपल्याला नावं ठेवले नाही पाहिजेत, समाजाचं नुकसान झालं नाही पाहिजे, ही जबाबदारी आपली आहे. मराठ्यांनी अंतरवालीतून सांगितले होते की या तारखेपर्यंत प्रश्न सोडवा पण सरकारने सोडले नाहीत म्हणून मराठे मुंबईत आले हे मुंबईकरांना वाटलं पाहिजे. टिकणारं आणि पक्क आरक्षण फक्त कुणबीचंच आहे. पक्क टिकू देत नाहीत, तर दुसरं कसं टिकू देतील, असंही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
मराठ्यांचं शांततेचं आंदोलन सुध्दा उग्र आंदोलनासारखं वाटलं पाहिजे. वेळ देऊन चाललो आहे. मी डायरेक्ट मुंबईमध्ये येत नाहीये. हे आंदोलन तर सुरूच आहे, मुंबईच्या आणि अंतरवालीच्या दोन्ही ठिकाणच्या आंदोलनाला आपल्याला ताकद लावायची आहे. महाराष्ट्रातले मराठा बांधव बोलावून आपण 12 तारखेला मुंबईची तारीख जाहीर करू, असं यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान आता मनोज जरांगे यांच्या या आंदोलनावर सरकार कसा तोडगा काढणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
