सहा वर्षापूर्वी सुरु झालेलं ‘संगीत देवबाभळी’ घेणार निरोप; यादिवशी पार पडणार शेवटचा प्रयोग

'संगीत देवबाभळी' हे नाटक सहा वर्षांपूर्वी सुरू झालं होतं. आता या नाटकाचा शेवटचा प्रयोग लवकरच पार पडणार आहे. हे नाटक रसिकांचा निरोप घेणार आहे. रंगभूमीवर हे नाटक प्रचंड गाजलं. या नाटकाला सर्वाधिक 44 पुरस्कार मिळाले आहेत. त्याचा शेवटचा प्रयोग कधी आणि कुठे पार पडणार, ते जाणून घ्या..

सहा वर्षापूर्वी सुरु झालेलं संगीत देवबाभळी घेणार निरोप; यादिवशी पार पडणार शेवटचा प्रयोग
Sangeet Devbabhali
Image Credit source: Tv9
| Updated on: Nov 20, 2023 | 1:54 PM

मुंबई : 20 नोव्हेंबर 2023 | 22 डिसेंबर 2017 यादिवशी ‘भद्रकाली’ प्रॉडक्शन’च्या ‘संगीत देवबाभळी’ या नाटकाचा शुभारंभ झाला. सहा वर्षांपूर्वी सुरू झालेला हा प्रवास आता अंतिम टप्प्यात आला आहे. विठुरायाच्या आशीर्वादाने आणि नाट्यरसिकांच्या प्रेम प्रतिसादाने भारावलेली ही ‘संगीत देवबाभळी’ची नाट्य दिंडी आता विसावणार आहे. येत्या बुधवारी म्हणजेच 22 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6.30 वाजता या नाटकाचा शेवटचा प्रयोग पार पडणार आहे. मुंबईतील सायन इथल्या श्री षण्मुखानंद चंद्रशेखरेंद्र सरस्वती सभागृहात हा प्रयोग संपन्न होणार आहे.

पटकावले सर्वाधिक 44 पुरस्कार

हा सहा वर्षांचा प्रवास इतका सहज आणि सोपा नव्हता. एक नवा विषय, नवीन लेखक, नवे कलाकार घेऊन व्यावसायिक रंगभूमीवर येणं तसं अवघड होतं. परंतु भद्रकालीने हा प्रयोग केला आणि आपल्या साथीने तो यशस्वही झाला. या प्रवासादरम्यान कोरोनासारखं भयाण संकट येऊन गेलं. पण त्यानंतरही रसिकांचं प्रेम कमी झालं नाही. ते चंद्रभागेसारखं वाहतच राहिलं. याच प्रेमामुळे या नाटकाने सर्वाधिक 44 पुरस्कार प्राप्त केले आणि लाखो रसिकांसह अनेक दिग्गजांच्या मनाला भुरळ घातली. मजल दरमजल करत अवघा महाराष्ट्र विठुमय करणारी ही ‘देवबाभळी’ आता 500 व्या प्रयोगापर्यंत येऊन पोहोचली आहे.

शेवटचा प्रयोग कधी?

खरं तर मायबाप रसिकांचा आग्रह आहे की, नाटक बंद करू नका. मात्र कुठेतरी थांबणं हे गरजेचं असतं, म्हणून ही वारी 500 व्या प्रयोगापर्यंत नेऊन थांबणार आहे. महाराष्ट्रातला हा शेवटचा प्रयोग येत्या 22 नोव्हेंबर 2023 रोजी मोठ्या दिमाखात सादर होत आहे. अनेकांनी हा प्रयोग अजूनही पाहिलेला नाही तर काहींनी या प्रयोगाची पारायणं केली आहेत. अशा सर्व मायबाप रसिकांसाठी ‘संगीत देवबाभळी’ हे नाटक पाहण्याची ही शेवटची संधी आहे.

प्राजक्त देशमुख लिखित-दिग्दर्शित या नाटकाने रंगभूमीवर इतिहास घडवला. ‘संगीत देवबाभळी’ला आजवर असंख्य पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार मिळाले आहेत. अनेक विद्यापीठांतील अभ्यासक्रमात त्याचा समावेश आहे. प्राजक्त देशमुख यांचं हे नाटक व्यावसायिक रंगभूमीच्या चाकोरीशी पूर्णपणे फटकून आहे. विषय, आशय, मांडणी हे या नाटकाचं वैशिष्ट्य आहे. अवघ्या दोन पात्रांचं हे नाटक आहे. या दोन कलाकारांनी हे नाटक समर्थपणे पेललं आहे. शुभांगी सदावर्ते यांची आवली पाहणं हा नाट्यरसिकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव आहे. त्यांचं व्यावसायिक रंगभूमीवरील हे पहिलंच नाटक आहे. तर मानसी जोशी यांनी लखूबाई अत्यंत ठामपणे उभी केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us