
Char Dham Yatra 2026 : चारधाम यात्रा 2026 पूर्वी मोठे बदल जाहीर करण्यात आले असून विशेषतः गैर-सनातनी भाविकांच्या प्रवेशाबाबत नवीन नियम लागू केल्याची माहिती समोर आली आहे. श्री बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीच्या वतीने याबाबत महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे.
केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष हेमंत द्विवेदी यांनी स्पष्ट केले की, बद्रीनाथ आणि केदारनाथ येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाचे स्वागत आहे. परंतु जे गैर-सनातनी आहेत त्यांनी मंदिरात प्रवेश करण्यासाठी शपथपत्र देणे बंधनकारक असेल. या एफिडेव्हिटमध्ये ‘मी सनातनी आहे’ असे नमूद करावे लागेल. ही संपूर्ण प्रक्रिया मंदिर समितीकडूनच केली जाणार आहे.
सारा अली खानसंदर्भात विशेष उल्लेख
या निर्णयाबाबत बोलताना अध्यक्षांनी सारा अली खानचा उदाहरण म्हणून उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, जर त्या मंदिरात दर्शनासाठी येऊ इच्छित असतील तर त्यांनाही हा शपथपत्राचा नियम पाळावा लागेल. दरवर्षी केदारनाथ-बद्रीनाथ यात्रेला भेट देणाऱ्या सारा अली खानसाठी यंदा हे नियम आव्हानात्मक ठरू शकतात.
चारधाम यात्रा 2026 ही 19 एप्रिलपासून सुरू होणार असून, यंदा यात्रेत अनेक बदल करण्यात आले आहेत. यात्रेच्या सुरक्षेच्या आणि व्यवस्थापनाच्या दृष्टीने हे निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.
मोबाईल वापरावर निर्बंध
मंदिर परिसरात मोबाईल नेण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. भाविकांसाठी क्लॉक रूमची व्यवस्था केली जाणार असून, तिथे मोबाईल ठेवावे लागतील. विशेष म्हणजे VIP व्यक्तींनाही हा नियम लागू असेल.
याशिवाय, मंदिरातील मौल्यवान वस्तू आणि धार्मिक चिन्हे बाहेर नेण्याबाबतही कडक भूमिका घेण्यात आली आहे. इतिहासात कधीही बद्रीनाथ-केदारनाथ मंदिरातील मुकुट किंवा मौल्यवान वस्तू बाहेर नेल्या गेल्या नाहीत आणि पुढेही नेल्या जाणार नाहीत असे स्पष्ट करण्यात आले. काही ठिकाणी धार्मिक वस्तू हलवण्याबाबतच्या चर्चांवरही समितीने आक्षेप घेतला असून त्यावर तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, चारधाम यात्रा 2026 मध्ये यंदा अनेक महत्त्वाचे बदल पाहायला मिळणार आहेत. विशेषतः धार्मिक आस्था, शिस्त आणि सुरक्षेला प्राधान्य देत नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे भाविकांनी यात्रेला जाण्यापूर्वी या नियमांची माहिती घेणे आवश्यक ठरणार आहे.