Shabana Azmi | “एकमेकांचा जीव घ्यावासा वाटतो”; जावेद अख्तर यांच्याबद्दल असं का म्हणाल्या शबाना आझमी?

शबाना या लवकरच 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामध्ये आलिया भट्ट, रणवीर सिंग, धर्मेंद्र आणि जया बच्चन यांच्याही भूमिका आहेत. करण जोहरने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Shabana Azmi | एकमेकांचा जीव घ्यावासा वाटतो; जावेद अख्तर यांच्याबद्दल असं का म्हणाल्या शबाना आझमी?
शबाना आझमी, जावेद अख्तर
Image Credit source: Instagram
| Updated on: May 30, 2023 | 2:42 PM

मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी आणि गीतकार जावेद अख्तर यांनी 1984 मध्ये लग्नगाठ बांधली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शबाना आझमी या जावेद यांच्यासोबतच्या नात्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाल्या. आमच्यात दररोज खूप भांडणं होतात, कधीकधी तर एकमेकांचा जीव घ्यावासा वाटतो, असं त्या म्हणाल्या आहेत. मात्र नात्यात एकमेकांविषयी आदरसुद्धा तेवढाच आहे, असंही त्यांनी सांगितलं. जावेद अख्तर यांनी हनी इराणी यांच्यासोबत पहिलं लग्न केलं होतं. या दोघांना फरहान आणि झोया अख्तर ही दोन मुलं आहेत.

‘फिल्मफेअर’ला दिलेल्या मुलाखतीत शबाना यांना प्रेमाबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा त्या म्हणाल्या, “मी कधीच रोमँटिक नव्हते. त्या काळात तरुणींना रोमान्सबद्दल बरंच काही माहीत होतं. पण मी त्यांच्यासारखी कधीच नव्हते. कारण मी माझ्या आईवडिलांचा संसार पाहिला होता. त्यांच्या नात्यात सुरुवातीला खूप प्रेम होतं, पण नंतर ते मैत्रीवर येऊन थांबले. त्यामुळे मी प्रेमापेक्षा जास्त महत्त्व मैत्रीला देते.”

पती जावेद अख्तर यांच्यासोबतच्या नात्याविषयी त्या पुढे म्हणाल्या, “जावेद आणि मी खूप भांडतो. कधी कधी वाद इतके टोकाला जातात की आम्हाला एकमेकांचा जीव घ्यावासा वाटतो. पण दिवसाअखेर एकमेकांचा आदर करणं खूप महत्त्वाचं असतं. आमचं नातं असंच आहे. आमचा दृष्टीकोन इतका समान आहे की आम्हाला अरेंज्ड मॅरेज करायला पाहिजे होतं. आम्हा दोघांचे वडील कवी होते, ते दोघे कम्युनिस्ट पार्टीचे होते आणि दोघंही हिंदी चित्रपटांमध्ये गीतकार होते. जावेद आणि माझ्यात खूप चांगली मैत्री आहे. जावेद यांना असं बोलायला खूप आवडतं की शबाना माझी सर्वांत चांगली मैत्रीण आहे आणि ही मैत्री इतकी चांगली आहे की लग्नसुद्धा त्याला तोडू शकली नाही.”

शबाना या लवकरच ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामध्ये आलिया भट्ट, रणवीर सिंग, धर्मेंद्र आणि जया बच्चन यांच्याही भूमिका आहेत. करण जोहरने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.