बंदी घालायची असेल तर घाला, माझी कमाई का रोखता? ‘विमल’ जाहिरातीवरून नोटिशीदरम्यान शाहरुखचं ते वक्तव्य चर्चेत
Shah Rukh Khan: अभिनेता शाहरुख खानसह अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना 'विमल इलायची'च्या जाहिरातीवरून एफडीएकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शाहरुखचं जुनं वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) नोटीस बजावली आहे. या तिघांनी मिळून केलेल्या ‘विमल इलायची’च्या जाहिरातीसंदर्भात त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यामुळे शाहरुख खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या जाहिरातीच्या माध्यमातून प्रतिबंधित पान मसाला ब्रँडची अप्रत्यक्ष जाहिरात होत असल्याचा एफडीएचा आक्षेप आहे. या कारवाईनंतर शाहरुख खानचं काही वर्षांपूर्वीचं एक वक्तव्य पुन्हा सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. जाहिराती आणि सेलिब्रिटींच्या ब्रँड एंडोर्समेंटबाबत तो एका मुलाखतीत स्पष्टपणे व्यक्त झाला होता. सध्याच्या एफडीएच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर त्याचं हे जुनं वक्तव्य पुन्हा व्हायरल होत आहे.
काय म्हणाला होता शाहरुख?
काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत शाहरुखला विचारण्यात आलं होतं की, सरकार सेलिब्रिटींना आरोग्यासाठी हानिकारक किंवा मुलांवर परिणाम करणाऱ्या उत्पादनांचं समर्थन न करण्याचा सल्ला देते का? यावर उत्तर देताना शाहरुख म्हणाला होता, “जर कोणतंही उत्पादन लोकांच्या आरोग्यासाठी हानिकारक असेल, तर सरकारने त्यावर तात्काळ बंदी घालावी. सरकारला एखादं उत्पादन हानिकारक वाटत असेल, तर त्याला बाजारात विकण्याची परवानगी देऊ नये. जर सिगारेट वाईट असेल तर त्याचं उत्पान थांबवा, जर कोल्ड ड्रिंक्स वाईट असतील, तर त्यांचं उत्पादन थांबवा. सरकार अशा उत्पादनांवर बंदी घालत नाही, कारण त्यातून महसूल मिळतो. मग एका अभिनेत्याच्या कमाईवर निर्बंध घालण्याची चर्चा का होत आहे?”
या मुलाखतीत शाहरुखने स्पष्टपणे सांगितलं होतं की, तो एक अभिनेता आहे आणि काम करून पैसे कमावणं हे त्याचं ध्येय आहे. जर एखादी गोष्ट चुकीची मानल जात असेल, तर तिच्या उत्पादनावर आणि विक्रीवर बंदी घातली पाहिजे. शाहरुखने हे वक्तव्य एका कोल्ड ड्रिंक्सच्या जाहिरातीवरून झालेल्या वादानंतर केलं होतं.
FDA ची नोटीस
दरम्यान महाराष्ट्र एफडीएनं विमल इलायचीच्या जाहिरातीची गंभीर दखल घेतली आहे. विमल हे नाव प्रामुख्याने पान मसाल्याशी जोडलं गेलं असल्याने इलायचीच्या जाहिरातीमुळे ग्राहकांच्या मनात त्याच ब्रँडची आठवण निर्माण होऊ शकते, असा एफडीएचा युक्तीवाद आहे. त्यामुळे ही जाहिरात सरोगेट किंवा अप्रत्यक्ष जाहिरात ठरते का, याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.