1995 मधील प्रचंड हिट गाणं, जे आजही ऐकताच चाहते गुणगुणतात, शाहरुख-रवीनाची जोडी ठरलेली सुपरहिट
लाखो चाहत्यांचं आवडतं गाणं, जे 1995 मध्ये प्रदर्शित झाले असून आजही या गाण्याचे सोशल मीडियावर आहेत मोठ्या प्रमाणात चाहते. कुमार सानू-अलका याग्निक यांच्या आवाजामुळे ठरले प्रचंड लोकप्रिय.

1995 मध्ये प्रदर्शित झालेला शाहरुख खान आणि रवीना टंडन यांचा ‘जमाना दीवाना’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. मात्र, या चित्रपटातील ‘अब है नींद किसे, अब है चैन कहां’ हे गाणं आजही 90 च्या दशकातील सर्वात दर्दभऱ्या आणि लोकप्रिय गाण्यांपैकी एक म्हणून ओळखलं जातं. प्रेमात दुरावा, विरह आणि तुटलेल्या मनाची भावना या गाण्यातून इतक्या प्रभावीपणे व्यक्त झाली की ते त्या काळातील अनेक प्रेमींच्या ओठांवर होतं.
या गाण्याला नदीम-श्रवण या लोकप्रिय संगीतकार जोडीने सुरेल आणि भावूक संगीत दिलं होतं. गीतकार समीर यांच्या शब्दांना कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजाची साथ लाभली. गाण्याची चाल, शब्द आणि दोन्ही गायकांचा भावपूर्ण आवाज यामुळे हे गाणं प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर करून राहिलं.
रमेश सिप्पी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘जमाना दीवाना’मध्ये शाहरुख खान आणि रवीना टंडन मुख्य भूमिकेत होते. त्यांच्यासोबत अनुपम खेर, शत्रुघ्न सिन्हा, प्रेम चोप्रा आणि टीनू आनंद यांसारख्या दिग्गज कलाकारांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. रोमांस, कौटुंबिक संघर्ष आणि नाट्याने भरलेला हा चित्रपट 22 जुलै 1995 रोजी प्रदर्शित झाला.
बॉक्स ऑफिसवर अपयश, मात्र गाणं सुपरहिट
चित्रपटाची कथा सूरज प्रताप सिंह आणि मदनलाल मल्होत्रा या दोन जिवलग मित्रांभोवती फिरते. दोघांची मैत्री अतूट असते; मात्र सुंदरच्या कारस्थानांमुळे या मैत्रीचं रूपांतर वैरात होतं. पुढे दोघांच्या मुलांची म्हणजेच राहुल आणि प्रिया यांची भेट होते आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात.
‘जमाना दीवाना’कडून निर्मात्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, चित्रपट प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचण्यात अपयशी ठरला. उपलब्ध बॉक्स ऑफिस आकडेवारीनुसार, चित्रपटाने भारतात सुमारे 4.37 कोटी रुपये, तर जगभरात जवळपास 6.98 कोटी रुपयांची कमाई केली.
चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळवू शकला नसला तरी त्याचं संगीत मात्र चांगलंच गाजलं. विशेषतः ‘अब है नींद किसे, अब है चैन कहां’ या गाण्याने 90 च्या दशकातील विरहगीतांमध्ये आपली खास जागा निर्माण केली. आजही जुन्या हिंदी गाण्यांच्या चाहत्यांमध्ये हे गाणं आवडीने ऐकलं जातं.