वडिलांनी RSS बद्दल लिहिलेली स्क्रिप्ट वाचून राजामौलींच्या डोळ्यात तरळले अश्रू; म्हणाले..

| Updated on: Feb 19, 2023 | 10:15 AM

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राजामौली या चित्रपटाविषयी मोकळेपणे व्यक्त झाले. आरएसएसबद्दल लिहिलेल्या कथेबाबत त्यांना काय वाटतं आणि ते त्यावर चित्रपट बनवणार आहेत का, याविषयी राजामौलींनी सांगितलं.

वडिलांनी RSS बद्दल लिहिलेली स्क्रिप्ट वाचून राजामौलींच्या डोळ्यात तरळले अश्रू; म्हणाले..
RRR नंतर राजामौली बनवणार RSS वर चित्रपट?
Image Credit source: Instagram
Follow us on

हैदराबाद: एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘RRR’ या चित्रपटाला जगभरात प्रसिद्धी मिळाली. RRR सोबतच राजामौलींच्या इतर चित्रपटांच्या कथा त्यांचे वडील विजयेंद्र प्रसाद यांनी लिहिल्या आहेत. राजामौलींचे वडील सध्या RSS (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) वरील चित्रपटासाठी कथा लिहित आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राजामौली या चित्रपटाविषयी मोकळेपणे व्यक्त झाले. आरएसएसबद्दल लिहिलेल्या कथेबाबत त्यांना काय वाटतं आणि ते त्यावर चित्रपट बनवणार आहेत का, याविषयी राजामौलींनी सांगितलं.

“स्क्रिप्ट वाचताना खूप वेळा रडलो”

“मला स्वत:ला RSS बद्दल फारसं माहीत नाही. मी त्या संघटनेबद्दल ऐकलं आहे, पण ती कशी तयार झाली, त्यांचे विचार नेमके काय आहेत, त्या संघटनेचा विकास कसा झाला, हे सर्व मला माहीत नाही. पण मी माझ्या वडिलांनी लिहिलेली स्क्रिप्ट वाचली. ती अत्यंत भावूक आहे. ती स्क्रिप्ट वाचताना मी खूप वेळा रडलो, बऱ्याचदा. त्या स्क्रिप्टमधील नाट्याने मला रडवलं, पण त्या प्रतिक्रियेचा कथेच्या इतिहासाशी काहीही संबंध नाही”, असं राजामौली म्हणाले.

RSS वर चित्रपट बनवणार का?

RSS वरील या चित्रपटाचं दिग्दर्शन ते स्वत: करणार की नाही हे माहीत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. याविषयी बोलताना ते पुढे म्हणाले, “मी वाचलेली स्क्रिप्ट खूप भावनिक आणि खूप चांगली आहे. पण समाजाप्रती त्याची काय भूमिका असेल हे मला माहीत नाही. माझ्या वडिलांनी लिहिलेल्या कथेचं दिग्दर्शन मी करणार की नाही, असा प्रश्न तुम्ही विचारत आहात असं मी गृहित धरतो. सर्वप्रथम मला माहीत नाही की ते शक्य होईल की नाही. कारण मला याविषयीची खात्री नाही की माझ्या वडिलांनी ती स्क्रिप्ट इतर कोणत्या संस्थेसाठी, लोकांसाठी किंवा निर्मात्यांसाठी लिहिली आहे. माझ्याकडे तुमच्या प्रश्नाचं निश्चित उत्तर नाही. ती कथा दिग्दर्शित करणं ही माझ्यासाठी सन्मानाची बाब असेल. कारण ती खूप सुंदर आणि भावनिक कथा आहे. पण मला त्या स्क्रिप्टच्या परिणामांबद्दल खात्री नाही. मी असं म्हणत नाहीये की त्याचा नकारात्मक किंवा सकारात्मक परिणाम होईल. मात्र पहिल्यांदाच असं होतंय की त्याविषयी मला खात्री नाही.”

हे सुद्धा वाचा

राजामौलींचे वडील विजयेंद्र प्रसाद हे प्रसिद्ध पटकथालेखक आणि दिग्दर्शक आहेत. त्यांनी तेलुगू चित्रपटांसाठी काम केलं आहे. तेलुगूशिवाय त्यांनी हिंदी, कन्नड आणि तमिळ चित्रपटांसाठी कथा लिहिल्या आहेत.