प्रश्न विचारला की महाराष्ट्राचा अपमान..; विद्यार्थ्यांसाठी मराठी कलाकारांनी उठवला आवाज

कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर विविध कलाकारही प्रतिक्रिया देत आहेत. मुंबईतल्या एका आंदोलनात अभिनेत्री वनिता खरात सहभागी झाली होती.

प्रश्न विचारला की महाराष्ट्राचा अपमान..; विद्यार्थ्यांसाठी मराठी कलाकारांनी उठवला आवाज
वनिता खरात, सुमित राघवन, प्राजक्ता माळी
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 24, 2026 | 11:26 AM

नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली देशातील असंख्य विद्यार्थी आणि तरुण आंदोलन करत आहेत. दिल्लीतील जंतर मंतर या ठिकाणापासून सुरू झालेलं हे आंदोलन आता देशभरात पेटलं आहे. मुंबईतही ठिकठिकाणी विद्यार्थ्यांनी सीजेपीच्या समर्थनार्थ आंदोलन केलं. या आंदोलनावर आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जवर बॉलिवूड आणि मराठी कलाविश्वातील सेलिब्रिटींनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. सुमित राघवन, अमेय वाघ, प्राजक्ता माळी, वनिता खरात यांसारख्या कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित, व्हिडीओ शेअर करत विद्यार्थ्यांच्या बाजूने आवाज उठवला आहे.

काय म्हणाला सुमित राघवन?

“प्रश्न विचारू नका. जे चाललंय ते ठीक चाललंय. प्रश्न विचारल्याने देशाचा अपमान होतो. महाराष्ट्रात तर तुम्ही पाहिलंच असेल की सवाल केला तर महाराष्ट्राचा अपमान होतो. मग भले कोणी लोकप्रतिनिधी आणि त्याचे गुंड मिळून डॉक्टरांना निर्दयपणे मारू दे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. तेव्हा महाराष्ट्राचा अपमान होत नाही ना? पुल कोसळत आहेत, 2005 मध्ये पूर आला होता आणि आज 2026 आहे.. 21 वर्षांनंतरही परिस्थिती तशीच आहे. नालासोपारा, वसई-विरार भागात तीन-तीन दिवस वीज नसते. तेव्हा महाराष्ट्राचा अपमान होत नाही. प्रश्न विचारला तर लाठ्यांचा मार मिळतो. हे सर्व काय चाललंय. याला लोकशाही म्हणायचं की हुकूमशाही,” असा सवाल सुमितने केला आहे.

याविषयी तो पुढे म्हणाला, “त्या विद्यार्थ्याची काय चूक आहे? ही गोष्ट स्मार्ट पद्धतीने हाताळता आली नसती का? जेव्हा तुम्हाला अंदाज येतो की असं काही घडणार आहे, तेव्हाच संवाद का साधला गेला नाही. हे इतकं कठीण आहे का? त्या मुलांना कसं मारलं गेलंय? ही मुलं आपल्या देशातलीच आहेत ना? तुम्हीसुद्धा या देशाचेच आहात ना? काय बोलावं हेच मला कळत नाहीये? महाराष्ट्रातील एक नेते म्हणतायत की, ही लोकं दहशतवादी आहेत. आम्ही दहशतवादी आहोत का, ही मुलं दहशतवादी आहेत का? हीच मुलं या देशाचे भविष्य आहेत. कृपया खुर्त्यांवरून उठा, त्यांच्याशी संवाद साधा, त्यांच्या खांद्यावर हात ठेवा, त्यांचा विश्वास जिंका. तुम्ही ज्येष्ठ व्यक्ती आहात, कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठ सदस्याप्रमाणे आहात. त्यामुळे त्यांच्याशी बोला. मी त्या आंदोलक मुला-मुलींना सलाम करतो.”

प्राजक्ता माळीची पोस्ट-

‘आतापर्यंत मी दोन गोष्टींवर विश्वास ठेवलाय.. संवाद आणि शांती. कोणताही वाद निष्पक्ष चर्चेद्वारे सोडवला जाऊ शकतो आणि प्रत्येक व्यक्ती शांती आणि शांततापूर्ण वातावरणासाठी पात्र असतो. संवाद साधा आणि शांती निवडा. प्रत्येक विद्यार्थ्याच्या वेदनेसाठी माझं मन दुखावतंय’, अशा शब्दांत अभिनेत्री प्राजक्ता माळी व्यक्त झाली.

वनिता खरातने आंदोलनात दाखवलं संविधान


‘काल NEET प्रकरणातील विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्यात सहभागी झाले. आपण जिथे असू, तिथून अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. कारण आज प्रश्न फक्त एका परीक्षेचा नाही, तर लाखो विद्यार्थ्यांच्या विश्वासाचा, मेहनतीचा आणि आपल्या देशाच्या भविष्याचा आहे. लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणं हा गुन्हा नाही, तो प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार आहे. आपल्या संविधानाने आपल्याला तो अधिकार दिला आहे. विद्यार्थ्यांचा आवाज दाबून भविष्य घडत नाही; त्यांचा आवाज ऐकून राष्ट्र घडतं. आवाज द्या, प्रश्न विचारा, न्यायाची साथ द्या,’ अशी पोस्ट अभिनेत्री वनिता खरातने लिहिली आहे.

Follow Us