त्याने त्या दोघींसोबतच्या नात्याचा..; आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाबद्दल सेलिब्रिटी स्पष्टच बोलली
अभिनेता आमिर खान तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार आहे. यावर सुझान खानची बहीण फराह खान अलीने प्रतिक्रिया दिली आहे. आमिरच्या दोन्ही पूर्व पत्नी त्याच्याशी इतक्या सहजपणे कशा वावरतात, यावर ती मोकळेपणे व्यक्त झाली आहे.

अभिनेता आमिर खान आज (5 जुलै) मुंबईत गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटशी लग्नगाठ बांधणार आहे. गेल्या वर्षी साठाव्या वाढदिवशी आमिरने गौरीसोबतचं त्याचं नातं जगजाहीर केलं होतं. आता हे दोघं आयुष्याची नवी सुरूवात करण्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र वयाची साठी ओलांडल्यानंतर तिसरं लग्न करणाऱ्या आमिरवर काहीजण टीकासुद्धा करत आहेत. आमिरने 1986 मध्ये रिना दत्ताशी पहिलं लग्न केलं होतं. या दोघांना जुनैद आणि आयरा ही दोन मुलं आहेत. लग्नाच्या सोळा वर्षांनंतर डिसेंबर 2002 मध्ये त्याने घटस्फोट घेतला. त्यानंतर 2005 मध्ये त्याने दिग्दर्शिका किरण रावशी दुसरं लग्न केलं. या दोघांना आझार राव खान हा मुलगा आहे. जुलै 2021 मध्ये आमिर आणि किरणने विभक्त होत असल्याचं जाहीर केलं. आता आमिर तिसरं लग्न करत असला तरी रिना आणि किरण यांच्यासोबत त्याचं नातं खूप चांगलं आहे. किंबहुना रिना, किरण आणि गौरी यांच्यातही मैत्रीपूर्ण नातं असल्याचं पहायला मिळतंय. यावर आता सुझान खानची बहीण फराह खान अली हिने प्रतिक्रिया दिली आहे.
संजय खान आणि झरीन खान यांची मुलगी फराह खान अली ही नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाली, “हे खरंच खूप कूल आहे. आमिर स्वत: कूल आहे. त्याने त्याच्या पूर्व पत्नींचा आणि त्यांच्या नात्याचा खूप आदर केला असणार, म्हणूनच तो तिसऱ्या व्यक्तीसोबत आयुष्यात पुढे जात असताना त्या इतक्या सहजपणे त्याच्यासोबत वावरू शकत आहेत. ज्या नात्यात आदर असतो, त्यात पुढे जाणं सोपं होतं.” काही दिवसांपूर्वीच आमिर त्याच्या दोन्ही पूर्व पत्नी आणि गौरीसोबत एकाच कारने प्रवास करताना दिसला होता. आमिर आणि गौरी आता विशेष विवाह कायद्यानुसार लग्न करणार आहेत. त्याच्या राहत्या घरातच हे लग्न पार पडणार असून या लग्नाला फक्त दोन्ही बाजूंची कुटुंबं आणि जवळची मित्रमंडळी उपस्थित असतील.
या मुलाखतीत फराह तिची बहीण सुझान आणि हृतिकच्या घटस्फोटाविषयीही मोकळेपणे व्यक्त झाली आहे. घटस्फोटानंतर सुझान अर्सलान गोणीला डेट करत असून हृतिक हा अभिनेत्री सबा आझादसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. याविषयी ती पुढे म्हणाली, “मी सुझानसाठी खुश आहे. मला हृतिक आणि सबासाठीही आनंद आहे. अशी लोकं मिळणं खूप महत्त्वाचं असतं, जे आपल्याला आनंद देतात. जेव्हा आम्ही सर्वजण एकत्र येतो, तेव्हा प्रत्येकाला पूर्वीच्या जोडीदारांसोबत अत्यंत सहज वावरताना पाहून अनेकांना आश्चर्य वाटतं. पण हे सहज नाही. यात कोणताही द्वेष, कोणतीही नकारात्मकता किंवा भूतकाळाचं ओझं नसतं. म्हणूनच तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकता. मग तुम्ही ज्या व्यक्तीला सोडलं आहे, तिच्यासाठी आनंदी का राहू नये? आनंदी राहण्यासाठी दुसऱ्याच्या दु:खाची गरज का आहे?”