TMKOC |”मला माशीसारखं बाजूला काढलं”; ‘तारक मेहता..’च्या रिटा रिपोर्टरकडून निर्मात्यांवर गंभीर आरोप

| Updated on: May 22, 2023 | 7:57 AM

मालवशी लग्न झाल्यानंतर सेटवर वेगळी वागणूक मिळाल्याचाही आरोप प्रियाने यावेळी केला. "मोनिका आणि जेनिफर यांनी जे आरोप केले आहेत, ते खरेच आहेत. मालिकेच्या निर्मात्यांकडून कलाकारांना योग्य वागणूक मिळत नाही," असं ती म्हणाली.

TMKOC |मला माशीसारखं बाजूला काढलं; तारक मेहता..च्या रिटा रिपोर्टरकडून निर्मात्यांवर गंभीर आरोप
Asit Modi and Priya Ahuja
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या काही दिवसांपासून सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे. सर्वांत आधी मिसेस रोशन सोढीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने निर्मात्यांवर लैंगिक शोषणाचा आरोप केला. त्यानंतर बावरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मोनिका भदौरियानेही बरेच आरोप केले. आता मालिकेत रिटा रिपोर्टरची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रिया अहुजानेही निर्माते असित मोदी यांच्यावर आरोप केले आहेत. ‘तारक मेहता..’ या मालिकेत प्रिया सुरुवातीपासून काम करतेय. तिची रिटा रिपोर्टरची भूमिका प्रेक्षकांमध्ये फार लोकप्रिय आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून ती मालिकेत दिसलीच नाही.

ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत प्रिया म्हणाली, “होय, तारक मेहता या मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. मलासुद्धा मालिकेत काम करताना बराच त्रास झाला, पण त्याचा मी माझ्यावर फार परिणाम होऊ दिला नाही. कारण माझा पती मालव गेल्या 14 वर्षांपासून मालिकेचं दिग्दर्शन करत होता. निर्माते असित मोदी, प्रॉडक्शन टीमचे सोहैल रमाणी आणि जतिन बजाज हे मला मोठ्या भाऊंसारखे आहेत. त्यांनी माझ्यासोबत कधी गैरवर्तन केलं नाही. पण मला सेटवर योग्य वागणूक दिली गेली नाही. मालवशी माझं लग्न झाल्यानंतर त्यांनी मालिकेतील माझी भूमिकाच कमी केली. मी अनेकदा त्यांना कारण विचारलं, पण त्यांनी मला उत्तर देणं टाळलं. एकदा ते मला म्हणाले की, अरे तुला काम करायची काय गरज? मालव काम करतोय ना. मी मालवशी लग्न करण्याच्या आधीपासून मालिकेत काम करतेय.”

हे सुद्धा वाचा

प्रियाचा पती मालवने काही महिन्यांपूर्वीच मालिका सोडली. त्यानंतर प्रियाला मालिकेत कामच मिळालं नाही. याविषयी ती पुढे म्हणाली, “मला याचं फार वाईट वाटतं की जेव्हापासून माझ्या पतीने ती मालिका सोडली, त्यांनी मला कामासाठी फोनच केला नाही. त्यांनी माझ्या मेसेजचंही उत्तर दिलं नाही. मी वारंवार त्यांना कारण विचारलं, मात्र त्यांच्याकडून मला कोणतीच प्रतिक्रिया मिळाली नाही. गेल्या सहा-आठ वर्षांपासूनचं त्यांचं वागणं पाहता, मला वाटत नाही की ते मला पुन्हा कधी कॉल करतील. मालव जेव्हा मालिका सोडत होता तेव्हा मी त्याला म्हणाले होते की, ते लोक मला कॉल करणार नाहीत किंवा माझ्या प्रश्नांची उत्तरं देणार नाहीत. ते मला असंच ताटकळत ठेवतील.”

मालवशी लग्न झाल्यानंतर सेटवर वेगळी वागणूक मिळाल्याचाही आरोप प्रियाने यावेळी केला. “मोनिका आणि जेनिफर यांनी जे आरोप केले आहेत, ते खरेच आहेत. मालिकेच्या निर्मात्यांकडून कलाकारांना योग्य वागणूक मिळत नाही. गेल्या नऊ महिन्यांपासून त्यांनी मला ताटकळत ठेवलंय. माझ्या पतीने मालिका सोडल्यानंतर त्यांनी मला माशीसारखं काढून फेकून दिलंय”, अशा शब्दांत प्रियाने संताप व्यक्त केला.