त्यांची शेवटची इच्छा अपूर्णच..; वडिलांच्या आठवणीत ‘तारक मेहता..’मधील ‘बाघा’ भावूक
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत बाघाची भूमिका साकारणारा अभिनेता तन्मय वेकारियाने त्याचं दु:ख व्यक्त केलं आहे. जून महिन्यात त्याच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यांची शेवटची इच्छा अपूर्णच राहिल्याचं त्याने सांगितलं आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक काळापासून सुरू असलेली मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे. त्यापैकीच एक भूमिका ही बाघाची आहे. अभिनेता तन्मय वेकारिया गेल्या अनेक वर्षांपासून या मालिकेत बाघाची भूमिका साकारत आहे. या भूमिकेमुळे त्याला घराघरात लोकप्रियता मिळाली. मात्र गेल्या काही काळापासून तन्मय त्याच्या खासगी आयुष्यात अत्यंत कठीण काळाचा सामना करत आहे. जून महिन्यात तन्मयचे वडील आणि प्रसिद्ध गुजराती अभिनेते अरविंद वेकारिया यांचं निधन झालं. वडिलांच्या निधनाने तन्मय पूर्णपणे खचला आहे.
‘तारक मेहता..’ या मालिकेला 18 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित केलेल्या सेलिब्रेशनमध्ये तन्मय त्याच्या वडिलांना आठवत भावूक झाला होता. यावेळी त्याने वडिलांच्या शेवटच्या इच्छेविषयी खुलासा केला. तन्मयने सांगितलं की, त्याच्या वडिलांच्या निधनापूर्वी जेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, तेव्हा मालिकेत बाघा आणि बावरीची प्रेमकथा सुरू होती. कठीण काळातही त्याच्या वडिलांनी त्याला काम करत राहण्यासाठी प्रोत्साहन दिलं होतं.
मालिकेच्या सक्सेस पार्टीमध्ये माध्यमांशी बोलताना तन्मयने त्याच्या वडिलांसोबत झालेल्या शेवटच्या संभाषणाची आठवण सांगितली. “ते मला म्हणाले, सेटवर माझ्या निधनाची काही बातमी आली तर, परत येण्याची घाई करू नकोस. जमेल तितकं उत्तम काम पूर्ण कर. निर्मात्यांचं कोणतंही नुकसान होता कामा नये.” वडिलांची शेवटची इच्छा सांगताना तो पुढे म्हणाला, “माझे वडील दररोज रात्री साठेआठ ते नऊच्या दरम्यान ‘तारक मेहका उल्टा चष्मा’ ही मालिका बघत बसायचे. जेव्हा ते रुग्णालयात होते आणि माझा एपिसोड प्रसारित होत होता, तेव्हा ते म्हणाले होते की, तुझी कथा खूप छान पुढे जात आहे. मी घरी आल्यावर मला युट्यूबवर सर्व एपिसोड दाखव. मला ते सर्व एपिसोड्स बघायचे आहेत. पण दुर्दैवाने तसं घडलं नाही.”
वडिलांच्या निधनाच्या काही महिन्यांपूर्वीच तन्मयच्या आईचंही निधन झालं होतं. काही महिन्यांच्या अंतरावरच आई आणि वडिलांना गमावल्याने तन्मयवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या दु:खातून तो हळूहळू सावरण्याचा प्रयत्न करत आहे.