“तिचं वय काय, ती बोलते काय?”; सोनू भिडेवर भडकले ‘तारक मेहता..’चे निर्माते, नेमकं प्रकरण काय?
'तारक मेहता..' या मालिकेत सोनू भिडेची भूमिका साकारलेली अभिनेत्री पलक सिंधवानीने निर्मात्यांवर काही गंभीर आरोप केले होते. या आरोपांवर आता निर्माते असित मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तिचं वय काय आहे, तिला किती समज आहे.. असं ते म्हणाले.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका चाहत्यांमध्ये जेवढी लोकप्रिय आहे, तेवढेच त्यातील कलाकारांचे वादही चर्चेत असतात. यामध्ये सोनू भिडेची भूमिका साकारणारी अभिनेत्री पलक सिंधवानीने 2024 मध्ये ही मालिका सोडली. त्यावेळी पलकवर मालिकेचा करार मोडल्याचा आरोप करण्यात आला होता. तर दुसरीकडे पलकने मालिकेच्या निर्मात्यांवर मानसिक शोषण आणि पैसे वेळेवर न दिल्याचा आरोप केला होता. आता ‘तारक मेहता..’चे निर्माते असित मोदी यांनी याप्रकरणावर मौन सोडलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी आरोप केला की, “पलकचे सेटवर खूप नखरे होते आणि कोणतीच शिस्त पाळायची नाही.”
‘न्यूज 18’ला दिलेल्या मुलाखतीत असित मोदी म्हणाले, “सेटवर सर्वांनात शिस्तीत काम करायचं असतं. मी स्वत: माझ्या मर्यादेत राहून काम करतो. कलाकारांसोबत आमचे करार झालेले असतात. आम्हाला दर महिन्याला 26 एपिसोड्स शूट करायचे असतात. कराराचं उल्लंघन केल्यास ते स्वीकार केलं जाणार नाही. लोक तुम्हाला तुमच्या भूमिकांमुळे ओळखतात. मग ती पलक असो किंवा अजून कोणी.. अब्दुलचं खरं नाव शरद आहे. पण त्याला सर्वजण अब्दुल भाई म्हणूनच बोलवतात. लोक कलाकारांना त्यांच्या भूमिकांच्या नावांनीच ओळखतात. जर कोणी आमच्या मालिकेबद्दल कोहीही बोलत असेल तर त्याचा मालिकेच्या प्रतिमेवर वाईट परिणाम होतो.”
पलकबद्दल ते पुढे म्हणाले, “सर्वजण कराराअंतर्गत काम करतात. कोणीच करार मोडू शकत नाही. कलाकारांनी मालिकेबद्दल असं काही वाईट बोलल्यावर माझी नाराजी होते. पण तिचं वय काय आहे? तिला गोष्टींची समज किती आहे? जाऊ द्या.. बोलू द्या. तिच्या बोलण्यात काही दम नाही.”
‘तारक मेहता..’च्या निर्मात्यांनी पलकला कायदेशीर नोटीस बजावली होती. निर्मात्यांची लेखी परवानगी न घेतला पलकने इतर ब्रँडसोबत काम केल्याने कराराचं उल्लंघन झालंय, असं या नोटिशीत म्हटलं होतं. यामुळे मालिकेच्या निर्मात्यांना फटका सहन करावा लागला, म्हणूनच पलकला नोटीस बजावल्याचं म्हटलं गेलं. तर दुसरीकडे पलकने ‘तारक मेहता..’ ही मालिका सोडत असल्यामुळेच निर्माते अशा पद्धतीने कारवाई करत असल्याचा आरोप केला होता.