Aai Kuthe Kay Karte: आई कुठे काय करतेनं सोडला ट्रॅक? आधी अरुंधती बेपत्ता अन् आता फुल्ल टू क्राईम एपिसोड, रेटींगची भीती?

| Updated on: Jul 13, 2022 | 12:23 PM

फॅमिली ड्रामा अचानक क्राईम एपिसोडमध्ये बदलताना पहायला मिळतोय. 'जेव्हापासून यशला अटक झाली आहे तेव्हापासून ते पोलीस स्टेशन देशमुखांचं दुसरं घर असल्याचा फील येतोय,' असे कमेंट्स प्रेक्षक सोशल मीडियावर करू लागले आहेत.

Aai Kuthe Kay Karte: आई कुठे काय करतेनं सोडला ट्रॅक? आधी अरुंधती बेपत्ता अन् आता फुल्ल टू क्राईम एपिसोड, रेटींगची भीती?
Aai Kuthe Kay Karte: आई कुठे काय करतेनं सोडला ट्रॅक?
Image Credit source: Hotstar
Follow us on

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत बरेच ट्विस्ट येत आहेत. उत्तम कथानक, मालिकेत येणारी रंजक वळणं आणि कलाकारांचं दमदार अभिनय या कारणांमुळे ही मालिका टीआरपीच्या यादीत नेहमीच अग्रस्थानी असायची. मात्र आता रेटिंगच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी या मालिकेच्या कथानकात बरेच अनपेक्षित बदल करण्यात आले आहेत. आधी मालिकेत अरुंधती (Madhurani Prabhulkar) बेपत्ता झाली आणि यश (Yash Deshmukh) अजूनही तुरुंगातच आहे. फॅमिली ड्रामा अचानक क्राईम एपिसोडमध्ये बदलताना पहायला मिळतोय. ‘जेव्हापासून यशला अटक झाली आहे तेव्हापासून ते पोलीस स्टेशन देशमुखांचं दुसरं घर असल्याचा फील येतोय,’ असे कमेंट्स प्रेक्षक सोशल मीडियावर करू लागले आहेत. कथानकात झालेला अचानक बदल रेटिंगच्या भीतीमुळे झाला की काय, असाही अंदाज व्यक्त होत आहे.

मालिकेत सध्या तुरुंग, पोलीस, हत्येचा ट्रॅक

आई कुठे काय करते मालिकेत यश हा हत्येच्या आरोपाखाली तुरुंगात आहे. तो निर्दोष आहे हे सिद्ध करण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत. यश आणि नील कामतची मारामारी झाली तेव्हा कॅमेरा सुरू होता. त्यामुळे नेमकं काय घडलं हे कॅमेरात कैद झालं की नाही, हे मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना पहायला मिळेल. दुसरीकडे देशमुखांच्या बंगल्यासमोर एक महिला येते. मी सुदर्शन कामतांची पत्नी, नील कामतची आई आहे.. असं ती महिला म्हणताच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसतो. नील कामतच्या आईमुळे कोणत्या गोष्टींचा उलगडा होईल हेसुद्धा प्रेक्षकांना पुढील भागात पहायला मिळेल.

हे सुद्धा वाचा

पहा प्रोमो-

आपल्या हक्कांसाठी लढणारी अरुंधती, टिपिकल पुरुषी मानसिकतेचा अनिरुद्ध आणि संजना या तिघांभोवती फिरणारी मालिकेची कथा गेल्या काही दिवसांपासून नील कामतच्या हत्येभोवतीच फिरत आहे. मालिकेच अचानक आलेलं हे वळण पाहून प्रेक्षकसुद्धा अवाक् झाले आहेत. आता पुढचा दीड महिना हेच प्रकरण मालिकेत च्युईंगमसारखं चघळत राहणार, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर प्रेक्षकांकडून येऊ लागल्या आहेत. या सर्वांत यशची भूमिका साकारणाऱ्या अभिषेक देशमुखच्या दमदार अभिनयकौशल्याचं मात्र नेटकऱ्यांकडून खूप कौतुक होत आहे.