जुन्या मराठी मालिका निरोप घेणार, ‘या’ नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार!

| Updated on: Aug 03, 2021 | 1:36 PM

सध्या छोट्या पडद्यावरच्या मालिका प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहेत. मात्र, यातील काही प्रसिद्ध मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. या मालिकांच्या जागी नव्या मालिका (New Marathi Serials) प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाल्या आहेत.

जुन्या मराठी मालिका निरोप घेणार, ‘या’ नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार!
नव्या मराठी मालिका
Follow us on

मुंबई : सध्या छोट्या पडद्यावरच्या मालिका प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहेत. मात्र, यातील काही प्रसिद्ध मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. या मालिकांच्या जागी नव्या मालिका (New Marathi Serials) प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाल्या आहेत. पाहा कोणत्या नव्या मालिका करणार प्रेक्षकांचे मनोरंजन…

  1. माझी तुझी रेशीमगाठ

‘अल्फा मराठी’ आणि ‘झी मराठी’वरील ‘आभाळमाया’, ‘अवंतिका’ दूरदर्शनवरील ‘दामिनी’ या गाजलेल्या मराठी मालिकांसोबतच हिंदी सिनेसृष्टीमध्ये नावलौकिक मिळवलेला लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदे आता लवकरच मराठी टेलिव्हिजनवर पुनरागमन करतोय. छोट्या पडद्यावरून श्रेयसने आपल्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली होती आणि आता झी मराठीवरील आगामी मालिका “माझी तुझी रेशीमगाठ” या मालिकेतून श्रेयस तळपदे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर रसिक प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे.

मालिकेचं कथानक वेगळं असून, एक सुंदर प्रेमकथा या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत श्रेयस तळपदे सोबत अभिनेत्री प्रार्थना बेहेरे प्रमुख भूमिकेत असणार आहे. या मालिकेतील इतर कलाकार आणि कथानक अजूनही गुलदस्त्यात असून ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येईल.

  1. मन झालं बाजिंद

आजवर मालिकांमध्ये प्रेमाचा रंग गुलाबी असलेला आपण पाहिलाय. परंतु पहिल्यांदाच मन झालं बाजिंद या मालिकेत राया आणि कृष्णाच्या प्रेमकथेत पिवळ्या रंगाची उधळण आपल्याला पहायला मिळणार आहे. परंपरागत व्यवसायाला स्वतः कडील व्यवहार ज्ञानाने भरभराटीला नेणारा, माझं तुझं न करता प्रेमाची उधळण करणारा, त्याच्या कामाचा पसाराही मोठा आहे, असा आपला बाजिंदा नायक राया आहे.

मामा-मामीच्या घरी फुलासारखी वाढलेली, सी.ए. होण्याचं स्वप्नं पाहणारी, हुशार, सावरून घेणारी, मांडणी करणारी, संयमी, विचार करून कृती करणारी अशी ही कृष्णा आपली मुख्य नायिका आहे. यांच्या बाजिंद्या प्रेमाची ही गोष्ट आहे. राया आणि कृष्णा यांच्या बेभान, बेधुंद प्रेमाची गोष्ट हळदीचा कारखाना, फुललेली शेती अशा गावाकडील पार्श्वभूमीवर खुलणार आहे. या मालिकेतून अभिनेता वैभव चव्हाण आणि अभिनेत्री श्वेता राजन हे दोघे पहिल्यांदाच मुख्य भूमिकेतून प्रेक्षकांना  भेटणार आहेत.

  1. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं

‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मलिकेत अभिनेत्री अमृता पवार प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. 30 ऑगस्टपासून रात्री 9 वाजता ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे. नुकतंच या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आणि पाहता पाहता या प्रोमोला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं. या मालिकेचं कथानक नक्की काय असणार आहे आणि अमृतासोबत या मालिकेत अजून कोण कलाकार दिसणार आहेत, ही सर्व माहिती अजून गुलदस्त्यात आहे, पण प्रोमोने मालिकेबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला नेली आहे.

  1. ती परत आलीये

‘देवमाणूस’ या मालिकेने आपल्या वेगळ्या कथानकामुळे लोकप्रियतेचं शिखर गाठलं. मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आणि प्रेक्षकांनी या मालिकेला पसंती दर्शवली. पण आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे आणि त्याजागी एक नवीन गूढ रहस्यमय मालिका 16 ऑगस्ट पासून रात्री 10.30वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, मालिकेचं नाव ‘ती परत आलीये’ असं आहे. जेष्ठ अभिनेते विजय कदम या मालिकेत एका वेगळ्या आणि लक्षवेधी भूमिकेत दिसणार आहेत. विजय कदम हे बऱ्याच कालावधी नंतर टीव्हीवर पुनरागमन करणार आहेत.

हेही वाचा :

‘चि. सर्वज्ञ आणि कु. स्रग्वी’, प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या घरी आनंदाचा ‘डबल धमाका’!

‘तू लय बदललीस गं गंगे…’, अभिनेत्री राजश्री लांडगेसाठी चित्रा वाघ यांची खास पोस्ट