Raksha Bandhan: रक्षाबंधननिमित्त सेलिब्रिटींनी सांगितल्या भाऊ-बहिणींच्या गोड आठवणी

| Updated on: Aug 11, 2022 | 8:15 AM

या खास दिनानिमित्त सोनी एन्टरटेन्मेंट (Sony Entertainment) टेलिव्हिजनवरील कलाकारांनी आपल्या भावंडांच्या गोड आठवणी (Memories) सांगितल्या आहेत.

Raksha Bandhan: रक्षाबंधननिमित्त सेलिब्रिटींनी सांगितल्या भाऊ-बहिणींच्या गोड आठवणी
सेलिब्रिटींनी सांगितल्या भाऊ-बहिणींच्या गोड आठवणी
Image Credit source: Instagram
Follow us on

भावंडं म्हणजे मस्ती, खोड्या, चेष्टा-मस्करी आणि अगदी मारामारीसुद्धा! पण हे नातं जणू लोहचुंबकासारखंच असतं, त्यामुळे एकमेकांपासून दूर राहूच शकत नाहीत. भाऊ आणि बहीण यांच्यातील हे सुंदर नातं साजरा करण्याचा सण म्हणजे रक्षाबंधन (Raksha Bandhan). या खास दिनानिमित्त सोनी एन्टरटेन्मेंट (Sony Entertainment) टेलिव्हिजनवरील कलाकारांनी आपल्या भावंडांच्या गोड आठवणी (Memories) सांगितल्या आहेत. ‘बडे अच्छे लगते है 2’ या मालिकेत नंदिनी कपूरची भूमिका करणारी शुभावी चोक्सी म्हणते, “राखी पौर्णिमा हा असा सण असतो, जेव्हा सगळे कुटुंबीय एकत्र येतात. माझा धाकटा भाऊ शुभेन्द्र आणि त्याचा खास मित्र आनंद माझ्या घरी जेवायला येतात. मी त्यांना राखी बांधते. लहान असताना माझं शुभेन्द्रशी खूप भांडण व्हायचं. पण तो इतका गोड आहे की, तो नुसता हसायचा. मी नेहमी त्याच्या ताटातून जेवायचे, त्याच्या ताटातली मिठाई खायचे. आता मागे वळून बघते तेव्हा माझ्या या खोड्यांचं मलाच हसू येतं. खरं सांगायचं तर, जसजशी वर्षं उलटली, तसा या उत्सवाचा आनंद तसाच राहिला पण आमच्यातील भाऊ-बहिणीचं नातं मात्र आणखी दृढ होत गेलं. आमच्या कामाच्या व्यापामुळे मी भावाला दररोज भेटू शकत नाही, पण मला खात्री आहे की मला एखादा सल्ला हवा असेल किंवा आधार हवा असेल, तर तो नेहमी माझ्यासोबत असेल.”

‘अपनापन… बदलते रिश्तों का बंधन’ मालिकेत पल्लवीची भूमिका करणारी राजश्री ठाकूर म्हणते, “दरवर्षी मी माझ्या परिवारासह रक्षाबंधन सण साजरा करते. आमचं संयुक्त कुटुंब आहे. मला दोन भाऊ आहेत, त्यापैकी एक सख्खा आणि एक चुलत भाऊ आहे. माझ्या लहानपणापासून हा सण आमच्याकडे खूप थाटात साजरा होत आहे. सगळे जण माझ्या मोठ्या भावाच्या घरी जमतात. त्या दिवशी नारळी पौर्णिमा देखील असल्याने आमच्याकडे नित्यनेमाने नारळी भाताचा भेत असतो. दर वर्षी मी स्वतः नारळ आणि भाताचा हा गोड पदार्थ बनवते.”

‘अपनापन… बदलते रिश्तों का बंधन’ मालिकेत बरखाची भूमिका करणारी श्रद्धा त्रिपाठी म्हणते, “रक्षाबंधन म्हणजे भाऊ-बहिणीच्या गोड नात्याचा सण. माझं आणि माझ्या भावाचं नातंही असंच आहे. आमच्यात भांडणं तर होतातच पण दोन-तीन दिवसात ती मिटतात देखील. रक्षाबंधन सणाचा आनंद मात्र आम्ही भरपूर लुटतो. भाऊ असल्याची वेगळीच मजा असते, असे मला वाटते. तुम्हाला माहीत नसलेल्या अनेक गोष्टी तुम्हाला भावाच्या नजरेतून बघायला आणि अनुभवायला मिळतात. सगळे भाऊ आपल्या बहिणीच्या सुरक्षेविषयी फार जागरूक असतात. माझा भाऊ परदेशी राहात असल्याने आम्हाला एकमेकांची सोबत फारशी मिळत नाही. आता पडद्यावर मला एक नवं कुटुंब मिळालं असल्याने माझा सख्खा भाऊ न भेटल्याची खंत थोडी कमी होते. पडद्यावरचा माझा भाऊ विशेषतः अनमोल हा अगदी माझ्या भावासारखा आहे. आम्ही भांडतो, हसतो आणि एकमेकांच्या खोड्या काढतो. गौतम आणि अनमोलच्या रूपाने मला दोन नवीन भाऊच भेटले आहेत.”

हे सुद्धा वाचा

सुपरस्टार सिंगर 2 चा स्पर्धक आणि छोटा शेफ प्रत्युष आनंद म्हणतो, “सायली दीदीसारखी कॅप्टन मला दिल्याबद्दल मी या शोचा ऋणी आहे. या मंचावर मी पाऊल ठेवलं तेव्हापासून सायली दीदी माझ्यासोबत आहे आणि माझी काळजी घेत आहे. ती नेहमी मला प्रोत्साहन आणि मार्गदर्शन देत असते. आम्ही कधी कधी एकत्र जेवतो, गाणी ऐकतो, रियाज करतो आणि एकत्र वेळ घालवतो. ती माझं प्रेरणास्थान आहे आणि मी तिच्याकडून बरेच काही शिकलो आहे. मी तिला इतकेच सांगू इच्छितो की, तिने आजवर माझी काळजी घेतली आहे, तसाच मीही भविष्यात नेहमीच माझ्या सायली दीदीची काळजी घेईन.”