Devmanus 2 | तो परत येतोय, ‘देवमाणूस 2’ मालिकेचा उत्कंठावर्धक प्रोमो, डॉ. अजितकुमार पुन्हा भेटीला
‘देवमाणूस’ मालिकेच्या पहिल्या सिझनच्या अखेरच्या भागात डॉ. अजित कुमार देव उर्फ देवी सिंग रुग्णालयात असल्याचं दाखवलं होतं. तर देवी सिंगच्या काळ्या कृत्यांचा पर्दाफाश करणाऱ्या चंदाचा मृत्यू झाल्याचं दाखवण्यात आलं होतं.

मुंबई : छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘देवमाणूस’ (Devmanus) परत येत आहे. ‘देवमाणूस 2’ या मालिकेचा प्रोमो नुकताच झी मराठी वाहिनीवर दाखवण्यात आला. डॉ. अजितकुमार देव ही पाटी हटवण्यात आल्याचं प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे मालिकेत नेमकं काय पाहायला मिळणार याची उत्सुकता आहे. त्यासोबतच बाबू, सरु आजी, टोण्या, डिम्पी, वंदी आत्या, नाम्या, बजा ही पात्रं लवकरच पुन्हा पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
‘देवमाणूस’ मालिकेचे लोकप्रियतेचे शिखर
झी मराठीवरील ‘देवमाणूस’ या मालिकेने आपल्या वेगळ्या कथानकामुळे लोकप्रियतेचं शिखर गाठलं होतं. मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आणि प्रेक्षकांनी या मालिकेला पसंती दर्शवली. साताऱ्यातील लहानशा खेडेगावातील लोकांची फसवणूक करणाऱ्या डॉ. अजित कुमार देव उर्फ देवी सिंग या बोगस डॉक्टरची ही कथा होती. अभिनेता किरण गायकवाड याने अजित कुमार देवची भूमिका साकारली होती.
गावातील सर्वजण देवी सिंगला ‘देवमाणूस’ मानतात. मात्र या बुरख्याआड तो अनेकांची फसवणूक करतो, तब्बल अकरा जणांचे खून करतो, असं कथानक मालिकेच्या पहिल्या पर्वात पाहायला मिळालं होतं. एसीपी दिव्या सिंह त्याला फासापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्थाही करते, मात्र त्याची कोर्टातून मुक्तता होते. त्यानंतर चंदा त्याच्या कृष्णकृत्यांची पोलखोल करते, असं कथानक होतं.
पहिल्या सिझनच्या अखेरच्या भागात काय घडलं
‘देवमाणूस’ मालिकेच्या पहिल्या सिझनच्या अखेरच्या भागात डॉ. अजित कुमार देव उर्फ देवी सिंग रुग्णालयात असल्याचं दाखवलं होतं. तर देवी सिंगच्या काळ्या कृत्यांचा पर्दाफाश करणाऱ्या चंदाचा मृत्यू झाल्याचं दाखवण्यात आलं होतं. ऑगस्ट महिन्यात या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. मात्र अल्पावधीतच मालिकेचा दुसरा सिझन येत असून पुन्हा रात्री साडेदहा वाजताची वेळ प्रेक्षकांना राखून ठेवावी लागणार आहे.
पाहा प्रोमो
दरम्यान, ‘ती परत आलीये’ (Tee Parat Aaliye) ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या गूढ-रहस्यप्रधान मालिकेत एकामागून एक थरारक घटना घडताना दाखवल्या होत्या. मात्र ठरल्याप्रमाणे शंभर भागांनंतर ही मालिका संपणार आहे.
संबंधित बातम्या :
‘देवमाणसा’चा मुखवटा कायमचा उतरणार! पाहा ‘देवमाणूस’मध्ये पुढे काय घडणार…