The Kerala Story 2: 25 वर्षांत भारत इस्लामिक स्टेट बनेल, शरीया लागू होईल..; भीषण वास्तव दाखवणारा ‘द केरळ स्टोरी 2’चा ट्रेलर

The Kerala Story 2 Trailer : विपुल शाह निर्मित 'द केरळ स्टोरी'चा सीक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हिंदू मुलींची फसवणूक करून त्यांचं कशा पद्धतीने धर्मांतर आणि शोषण केलं जातं, याची कथा यात दाखवण्यात आली आहे.

The Kerala Story 2: 25 वर्षांत भारत इस्लामिक स्टेट बनेल, शरीया लागू होईल..; भीषण वास्तव दाखवणारा द केरळ स्टोरी 2चा ट्रेलर
The Kerala Story 2
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 17, 2026 | 12:17 PM

अभिनेत्री अदा शर्माची मुख्य भूमिका असलेला ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटावर जितकी टीका झाली, तितकाच बॉक्स ऑफिसवर त्याला दमदार प्रतिसादसुद्धा मिळाला होता. त्यानंतर आता ‘द केरळ स्टोरी 2’ हा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकताच या सीक्वेलचा ट्रेलर प्रदर्शित झाला. यामध्ये कथेची अधिक गडद बाजू अधोरेखित करण्यात आली आहे. विविध राज्यांमधील हिंदू मुलींना टारगेट करून कशा पद्धतीने त्यांचं शोषण आणि धर्मांतर केलं जातं, याची झलक या ट्रेलरमध्ये पहायला मिळते. सत्य घटनांपासून प्रेरित ही कथा असल्याचं ट्रेलरच्या सुरुवातीलाच स्पष्ट केलं आहे.

“इन्शाल्लाह, अगले 25 साल में पुरा भारत एक इस्लामिक स्टेट होगा, और पुरे भारत में शरीया लागू होता..” या संवादाने ट्रेलरची सुरुवात होते. त्यानंतर कथा थेट राजस्थानमध्ये पोहोचते, जिथे एक हिंदू कुटुंब त्यांच्या 16 वर्षांच्या मुलीचं बळजबरीने धर्मांतर करण्यात आल्याचा आरोप करत पोलीस ठाण्यात पोक्सो तक्रार दाखल करण्यासाठी जातं. त्यानंतर कथा मध्य प्रदेशाकडे वळते. तिथे हिंदू तरुणीला फसवून तिला लग्नाचं आमिष दाखवलं जातं. त्यानंतर तिला धर्मांतर करण्यास भाग पाडलं जातं. नंतर कशा पद्धतीने तिचा विश्वासघात होतो आणि तिचं शोषण केलं जातं, याचं भीषण वास्तव दाखवण्यात आलं आहे.

पहा ट्रेलर

तिसरी कथा प्रेक्षकांना पुन्हा केरळमध्ये घेऊन जाते. एक मुस्लीम पुरुष त्याच्या हिंदू गर्लफ्रेंडला लिव्ह-इन रिलेशनशिपचा प्रस्ताव देतो. परंतु जेव्हा ती ठामपणे सांगते की ती धर्मांतर करणार नाही, तेव्हा परिस्थिती बदलते. धर्मांतराच्या जाळ्यात अडकवून तरुण मुलींचा जो छळ केला जातो, त्याची अंगावर काटा आणणारी झलक या ट्रेलरमध्ये पहायला मिळते. या चित्रपटाचं दिग्दर्शन कामाख्या नारायण सिंहने केलं आहे. यामध्ये उल्का गुप्ता, अदिती भाटिया आणि ऐश्वर्या ओझा यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या ट्रेलरवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मुस्लीम मुलांशी प्रेमात पडल्यानंतर या तिन्ही मुलींच्या आयुष्यात जे भयानक वळण येतं, त्याचं चित्रण या चित्रपटात करण्यात आलं आहे. हा चित्रपट येत्या 27 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘द केरळ स्टोरी’वर काही राज्यांमध्ये बंदी घालण्यात आली होती. तर काहींनी हा चित्रपट प्रचारकी असल्याचं म्हटलं होतं.