The Kerala Story खोटी म्हणणाऱ्यांना निर्मात्यांचं सडेतोड उत्तर; ‘त्या’ 26 पीडितांना आणलं माध्यमांसमोर

| Updated on: May 18, 2023 | 9:34 AM

धर्मांतरानंतर आतापर्यंत सात हजार लोक परतले असून त्यात मुलं आणि मुलींचाही समावेश असल्याचा दावा करण्यात आला आहे. आर्य विद्या समाजाची स्थापना 1999 मध्ये झाली. या आश्रमाच्या माध्यमातून धर्मांतरित तरुण-तरुणींना पुन्हा सनातन धर्मात आणण्याचा प्रयत्न केला जातो.

The Kerala Story खोटी म्हणणाऱ्यांना निर्मात्यांचं सडेतोड उत्तर; त्या 26 पीडितांना आणलं माध्यमांसमोर
The Kerala Story real victims
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचा वाद थांबवण्याचं नाव घेत नाहीये. या चित्रपटातून मुस्लिम समाजाविरोधात द्वेष पसरवला जात असल्याचा दावा काही राजकीय पक्षांनी केला आहे. त्याचप्रमाणे केरळमधील 32 हजार महिलांना इस्लाम धर्म स्वीकारून ISIS या दहशतवादी संघटनेत सामील केल्याच्या निर्मात्यांच्या दाव्यावर काहींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला. बुधवारी या चित्रपटाचे निर्माते विपुल शाह यांनी मुंबईत ISIS मध्ये सामील होण्यासाठी कथितरित्या प्रवृत्त झालेल्या अशा 26 पीडितांना माध्यमांसमोर आणलं. यावेळी त्यांनी 50 लाख रुपयांचा धनादेशही मदत म्हणून त्यांना सुपूर्द केला.

“या मुलींना वाचवणं हेच आमचं ध्येय”

मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेत निर्माते विपुल शाह म्हणाले, “आमच्या चित्रपटाला प्रचारकी असल्याचं म्हटलं जात होतं. त्याला प्रेक्षकांनीच उत्तर दिलं. हे आरोप झाल्यानंतरही आम्ही हे सिद्ध करतोय की जे बोललो आणि दाखवलं ते खरं आहे. चित्रपटाचं जे व्हायचं असेल ते होईल, पण आता आमचं ध्येय या मुलींना वाचवणं आहे. आम्ही आमच्या चित्रपटातून तीन मुलींच्या माध्यमातून 32 हजार महिलांची कहाणी सांगितली आहे. या आकड्यावरून काही लोकांनी आमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. आमचं त्यावर हेच म्हणणं आहे की चित्रपटाती तीन मुलींच्या माध्यमातून आम्ही त्या 32 हजार पीडितांची कथा दाखवली आहे.”

“आम्ही इस्लाम धर्माची सेवाच केली”

आपला मुद्दा मांडत दिग्दर्शक सुदिप्तो सेन पुढे म्हणाले, “दहशतवाद केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात आहे. पण इतर देशांमध्ये दहशतवादाविरोधात विरोधक आणि सत्ताधारी एकत्र आहेत. आपल्या देशात दहशतवादाला धर्म नसतो असं म्हटलं जातं. पण दुर्दैवाने जेव्हा केरळचा प्रश्न आला तेव्हा लगेच लोक धर्माबद्दल बोलू लागले. माझ्या मते या चित्रपटातून आम्ही इस्लाम धर्माची सेवा केली आहे. कारण या धर्माचा गैरवापर होतोय. आपण किती धोक्यात आहोत हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक देशभक्त भारतीयाने हा चित्रपट पहावा.”

हे सुद्धा वाचा

पत्रकार परिषदेत 26 पीडित महिलाही उपस्थित

या पत्रकार परिषदेत निर्माते विपुल शाह, दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांच्याशिवाय मुख्य अभिनेत्री अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बलानी आणि सिद्दी इदनानीही उपस्थित होत्या. यावेळी केरळच्या आर्य विद्या समाजाच्या 26 मुलीही याठिकाणी उपस्थित होत्या. धर्मांतरानंतर या 26 मुली पुन्हा आर्य समाजात आल्या आहेत. त्यांचं ब्रेनवॉश करून धर्मांतर कसं झालं, याविषयी त्यांनी सांगितलं. धर्मांतरानंतर आतापर्यंत सात हजार लोक परतले असून त्यात मुलं आणि मुलींचाही समावेश असल्याचा दावा करण्यात आला आहे. आर्य विद्या समाजाची स्थापना 1999 मध्ये झाली. या आश्रमाच्या माध्यमातून धर्मांतरित तरुण-तरुणींना पुन्हा सनातन धर्मात आणण्याचा प्रयत्न केला जातो.