एका सीनसाठी 2000 ऊंट, 4000 घोडे अन् 8000 सैनिक आणले, बनवण्यासाठी लागली 16 वर्षे, कमाई पाहून निर्माते हादरले

बॉलिवूडमधील प्रचंड हिट चित्रपट. बनवण्यासाठी लागली 16 वर्षे. प्रदर्शित होताच बनवला रेकॉर्ड. 15 वर्षे राहिला कायम. री-रिलीजच्या वेळी विकली होती 9.17 कोटी तिकीटे.

एका सीनसाठी 2000 ऊंट, 4000 घोडे अन् 8000 सैनिक आणले, बनवण्यासाठी लागली 16 वर्षे, कमाई पाहून निर्माते हादरले
Image Credit source: Social media
| Updated on: Mar 02, 2026 | 3:45 PM

Mughal E Azam : 1960 मधील या चित्रपटाच्या कथेने संपूर्ण देश वेडा झाला होता. कारण दिग्दर्शक के. आसिफ यांचा भव्य चित्रपट Mughal-e-Azam बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत होता. पृथ्वीराज कपूर, दिलीप कुमार, मधुबाला आणि दुर्गा खोटे यांच्या दमदार अभिनयामुळे हा चित्रपट आजही भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट कलाकृतींपैकी एक मानला जातो.

या चित्रपटाची निर्मिती प्रक्रिया 1944 मध्येच सुरू झाली होती. मात्र तो 1960 मध्ये प्रदर्शित झाला. सुमारे 1.5 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 10 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली.

तिकिटांसाठी 5 किमी लांब रांगा

चित्रपटाची क्रेझ इतकी जबरदस्त होती की प्रेक्षक दोन-दोन दिवस आधी तिकिटांसाठी रांगेत उभे राहत. या रांगा तब्बल 5 किलोमीटरपर्यंत लागल्या होत्या. अभिनेता रजा मुराद यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, लोक शनिवारपासूनच अॅडव्हान्स बुकिंगसाठी रांगेत लागत आणि सोमवारच्या शोसाठी रस्त्यावर झोपत असत.

चित्रपटातील ‘प्यार किया तो डरना क्या’ हे गाणे आजही लोकप्रिय आहे. हे गीत गीतकार शकील बदायुनी यांनी तब्बल 105 वेळा लिहून सुधारले होते. अखेर संगीतकार नौशाद यांनी त्याला अंतिम मान्यता दिली.

या गाण्यासाठी लाहोर किल्ल्यातील शीशमहलची प्रतिकृती उभारण्यात आली होती. हा भव्य सेट तयार करण्यासाठी दोन वर्षे लागली आणि सुमारे 15 लाख रुपये खर्च झाला. विशेष म्हणजे, या गाण्याची ध्वनिमुद्रिका गायिका लता मंगेशकर यांनी स्टुडिओच्या बाथरूममध्ये रेकॉर्ड केली होती.

पोशाख आणि युद्धदृश्यांची भव्यता

चित्रपटातील वेशभूषा आणि दागिने अत्यंत खास होते. कपडे शिवण्यासाठी दिल्लीहून शिंपी बोलावले गेले तर सूरतहून कढाईकार. दागिने हैदराबादच्या सुवर्णकारांनी तयार केले. मुकुट कोल्हापुरातील कारागिरांनी घडवले शस्त्रे राजस्थानच्या लोहारांनी बनवली आणि जोडे आग्र्यातून मागवण्यात आले.

युद्धचा सीन वास्तववादी दिसावा यासाठी तब्बल 2000 उंट, 4000 घोडे आणि 8000 सैनिक वापरण्यात आले. काही जवान जयपूर रेजिमेंटमधून घेण्यात आले होते. या सर्व भव्यतेमुळे दिग्दर्शक के. आसिफ यांच्यावर मोठे कर्ज झाले होते.

‘मुगल-ए-आजम’ने प्रदर्शित होताच कमाईचे विक्रम प्रस्थापित केले. सलग 15 वर्षे हा भारतातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट राहिला. या चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासह तीन फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. री-रिलीजवेळीही तब्बल 9.17 कोटी तिकिटांची विक्री झाली.

Follow Us