100 वर्ष जुनी गझल, जी ऐकू येताच दिवसभर गुणगुणतात लोक, आजही प्रत्येक व्यक्तीची आवडती
100 वर्षे जुनी प्रचंड सुपरहिट गझल, जिला गुलाम अली आणि जगजीत सिंग यांनी बनवलं प्रचंड लोकप्रिय, आजही ऐकताच ताज्या होतात जुन्या आठवणी. दिवसभर मनातून जात नाही संगीत.

संगीताच्या दुनियेत काही गाणी आणि गझल अशा आहेत ज्या काळ कितीही पुढे गेला तरी त्यांची जादू कमी होत नाही. अशाच गझलपैकी एक म्हणजे ‘चुपके चुपके रात दिन आँसू बहाना याद है…’. जवळपास शंभर वर्षांपूर्वी लिहिलेली ही गझल आजही संगीतप्रेमींच्या हृदयाला स्पर्श करते. प्रसिद्ध गझलगायक गुलाम अली यांनी 1982 मध्ये आपल्या आवाजातून तिला अमरत्व दिले तर नंतर जगजीत सिंह यांच्या सादरीकरणामुळे ती नव्या पिढीपर्यंत पोहोचली. आता धुरंधर 2 मध्ये या गझलेची धून ऐकू आल्यानंतर ती पुन्हा चर्चेत आली आहे.
‘चुपके चुपके रात दिन आँसू बहाना याद है…’ ही गझल प्रसिद्ध शायर आणि स्वातंत्र्यसैनिक मौलाना हसरत मोहानी यांनी लिहिली होती. ही गझल नेमकी कोणत्या वर्षी लिहिली गेली याची अधिकृत नोंद उपलब्ध नसली तरी ती विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात लिहिली गेल्याचा अंदाज व्यक्त केला जातो. त्यामुळे ही गझल जवळपास शतकभर जुनी मानली जाते.
‘निकाह’ चित्रपटामुळे मिळाली मोठी लोकप्रियता
ही गझल आधीपासून अस्तित्वात असली तरी तिला सर्वाधिक लोकप्रियता मिळाली ती 1982 मध्ये प्रदर्शित झालेल्या निकाह या चित्रपटामुळे. दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांच्या या चित्रपटासाठी गुलाम अली यांनी आपल्या सुरेल आवाजात ही गझल सादर केली आणि ती घराघरात पोहोचली. त्यांच्या भावपूर्ण गायकीमुळे ही गझल संगीतविश्वातील अजरामर कलाकृतींपैकी एक ठरली.
‘धुरंधर 2’मुळे पुन्हा चर्चेत
अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर 2’ या चित्रपटातील एका महत्त्वाच्या सीनमध्ये या गझलेची धून ऐकायला मिळते. चित्रपटात रणवीर सिंहने साकारलेल्या हमजा आणि गौरव गेरा यांनी साकारलेल्या आलम भाई यांच्या संवादादरम्यान या गझलेचा वापर करण्यात आला आहे. चित्रपटातील हा छोटासा प्रसंगही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून सोशल मीडियावर अनेकांनी या गझलेच्या वापराचे कौतुक केले आहे.
प्रत्येक पिढीतील श्रोते आपल्या अनुभवांनुसार या गझलेचा अर्थ नव्याने अनुभवतात. म्हणूनच जवळपास शंभर वर्षांनंतरही ही गझल मैफिली, चित्रपट आणि संगीतप्रेमींच्या प्लेलिस्टमध्ये तितक्याच आवडीने ऐकली जाते. काळ बदलला, संगीताची शैली बदलली, तरी या गझलेची भावनिक ताकद आणि सुरांची जादू आजही तितकीच प्रभावी आहे.