Tukaram Mundhe: जाणूनबुजून शाहरुख, अजय देवगणला केलं टार्गेट? जाहिरातीबद्दल तुकाराम मुंढे स्पष्टच बोलले..
पान मसाल्याच्या अप्रत्यक्ष जाहिरातीप्रकरणी एफडीएनं शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना नोटीस बजावली आहे. या कारवाईमागील कारण तुकाराम मुंढेंनी स्पष्ट केलं आहे.

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) ‘विमल इलायची’च्या जाहिरातीप्रकरणी अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. नोटीस बजावल्यानंतर आता जवळपास एका आठवड्याने एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रसिद्धीसाठी मोठ्या सेलिब्रिटींना लक्ष्य करण्याचा हेतू नव्हता, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. ‘विमल’ कंपनीवर कारवाई करण्याऐवजी एफडीए थेट बॉलिवूड कलाकारांना का नोटीस बजावत आहे, असा प्रश्न अनेकांनी विचारला होता. त्यावरही तुकाराम मुंढे यांनी उत्तर दिलं आहे.
“अशा जाहिरातींमध्ये ब्रँडचा प्रचार करणाऱ्या सेलिब्रिटींचीही तितकीच जबाबदारी असते. अन्न सुरक्षा आणि मानकं (जाहिरात आणि दावे) नियम, 2018 मध्ये हे स्पष्टपणे नमूद केलं आहे”, असं मुंढे म्हणाले. प्रखर गुप्ता यांच्या युट्यूब चॅनलवर बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की, “या नोटिसा सरोगेट जाहिरातीशी संबंधित होत्या. तुम्ही ज्या गोष्टीचा प्रचार करता त्याबद्दल केलेला कोणताही दावा सत्य आणि अचूक असला पाहिजे. 2018 मध्ये अन्न क्षेत्रासाठी हा नियम लागू करण्यात आला होता आणि 2019 पासून तो अंमलात आहे. जाहिरातींमधील दावे स्पष्ट, अचूक आणि दिशाभूल करणारे नसावेत, हे सुनिश्चित करणं हा या नियमांचा उद्देश आहे. पर्यायी जाहिरातीद्वारे ज्या उत्पादनाचा प्रचार केला जात आहे, त्यावर महाराष्ट्रात बंदी आहे. त्यामुळे कंपनी त्याचं उत्पादन राज्याबाहेर करते. पण त्याचा अर्थ असा होत नाही की कंपनी देशभरात, विशेषत: महाराष्ट्रात त्याचा प्रचार करू शकते.”
शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांनी विमल या पान मसाला ब्रँडच्या इलायचीची जाहिरात केली होती. “पान मसाल्याचे अनेक ब्रँड अशाच प्रकारच्या अप्रत्यक्ष जाहिरातींचा अवलंब करतात आणि प्रसिद्ध सेलिब्रिटींना आपला चेहरा म्हणून वापरतात”, असंही तुकाराम मुंढे म्हणाले. याप्रकरणी सेलिब्रिटींना दोषी ठरवता येतं का, असा प्रश्न विचारल्यावर त्यावर मुंढेंनी होकारार्थी उत्तर दिलं. ते म्हणाले, एखाद्या उत्पादनाचं समर्थन करणाऱ्या सेलिब्रिटींचीदेखील ही जबाबदारी असते की, ती जाहिरात FSSAI च्या नियमांनुसार आहे याची खात्री करावी.
तुकाराम मुंढे यांच्या म्हणण्यानुसार, नियमांचं उल्लंघन केल्यास 10 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. जाहिराती मागे घेणे आणि इतर कारवाई करण्याचीही त्यात तरतूद आहे. एफडीए फक्त सेलिब्रिटींवरच कारवाई करत नाहीये, उत्पादक आणि विक्रेत्यांवरही कारवाई सुरू असून या प्रक्रियेतील सेलिब्रिटी हा तिसरा दुवा असल्याचं त्यांनी पुढे स्पष्ट केलं.