जरा फिरून येतो.. म्हणत प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शकांनी पुलावरून नदीत मारली उडी; संपवलं जीवन
प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक के. राजन यांनी पुलावरून नदीन उडी मारून आयुष्य संपवलं आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांनी टोकाचं पाऊल का उचललं, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.

तमिळ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते के. राजन यांच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. ते 85 वर्षांचे होते. चेन्नईमधल्या अड्यार इथल्या कूवम नदीत उडी मारून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या काही काळापासून ते त्यांच्या कुटुंबीयांपासून दूर एकटेच राहत होते. आत्महत्येच्या दिवशी ते वॉशरमॅनपेट इथून कारने निघाले होते. त्यांच्यासोबत त्यांचा ड्राइव्हरसुद्धा होता. जेव्हा त्यांची कार अड्यार नदीजवळ बनलेल्या पुलावर पोहोचली, तेव्हा त्यांनी ड्राइव्हरला गाडी थांबवण्यास सांगितलं. थोडं चालून येतो, असं म्हणून ते गाडीमधून उतरून पुढे गेले. त्यानंतर काही क्षणांतच त्यांनी अचानक पुलावरून नदीत उडी मारली.
पोलिसांकडून तपास सुरू
के. राजन यांच्या ड्राइव्हरने तातडीने मदतीची मागणी केली असता अग्निशमन विभागाची टीम घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी बचावकार्य सुरू केलं. परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. के. राजन यांचा मृतदेह नदीतून बाहेर काढल्यानंतर तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. पोलीस सध्या त्यांच्या ड्राइव्हरची चौकशी करून या प्रकरणाचा बारकाईने तपास करत आहेत. नदीत उडी मारण्यापूर्वी ते काही बोलले होते का, त्यांना कोणत्या गोष्टीची चिंता सतावत होती का, याची चौकशी पोलीस करत आहेत.
तमिळ सिनेसृष्टीतील प्रभावी व्यक्तिमत्त्व
के. राजन हे तमिळ चित्रपटसृष्टीतील एक प्रमुख व्यक्तिमत्त्व होते. ते सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असायचे. त्यांनी 1983 मध्ये ‘ब्रह्मचारिगल’ या चित्रपटाद्वारे निर्माता म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं. तसंच अभिनयातही नशीब आजमावलं. तमिळ चित्रपटसृष्टीत त्यांचा एक प्रभावी आवाज होता. त्यांनी निर्माते परिषदेच्या निवडणुकीत सक्रियपणे सहभाग घेतला होता. चित्रपटसृष्टीत जेव्हा कधी वाद किंवा समस्या निर्माण होत असे, तेव्हा ते नेहमीच मध्यस्थी करून सलोखा घडवून आणण्यासाठी आणि तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेत असत.
स्पष्टवक्तेपणामुळे अनेकदा वादाच्या भोवऱ्यात
के. राजन हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळेही चर्चेत असायचे. ते कोणत्याही विषयावर मोकळेपणे आणि निर्भयपणे बोलत असत, ज्यामुळे अनेकदा वाद निर्माण होत असत. इतकंच नव्हे तर मोठ्या कलाकारांची नावं उघडपणे घेण्यासाठी ते ओळखले जायचे. त्यांनी मोठ्या कलाकारांवर मोठ्या बजेटच्या आणि प्रायोगिक चित्रपट बनवण्याचा वारंवार आरोप केला आहे. अशा चित्रपटांमुळे निर्मात्यांवर कर्जाचा बोजा पडतो, असं त्यांचं मत होतं. हे मत मांडताना त्यांनी कार्तीच्या ‘आयिरथिल ओरुवन’ आणि धनुषच्या ‘एनाई नोकी पायूम थोटा’ या चित्रपटांचं उदाहरण देत असा युक्तीवाद केला होता की, हे चित्रपट अवाजवी महागडे होते, ज्यामुळे अखेरीस निर्माते कर्जात बुडाले.
के. राजन यांनी अभिनेत्री नयनताराच्या कोट्यवधींच्या मानधनावरही उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. मोठे कलाकार भरमसाठ मानधन घेतात, पण चित्रपटाचं प्रमोशन, ऑडिओ लाँच किंवा पत्रकार परिषदांना उपस्थित राहणं टाळतात, अशी तक्रार त्यांनी केली होती.
