“पोलिसांनी मला तिच्या घराजवळ..”; ऐश्वर्याच्या घराबाहेरील गोंधळानंतर जेव्हा सलमानने केला खुलासा

अभिनेता सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचं रिलेशनशिप सर्वाधिक चर्चेत होतं. या दोघांचे वादही जगजाहीर होते. 2001 मध्ये सलमानने ऐश्वर्याच्या घराबाहेर गोंधळ घातला होता. त्याविषयी तो एका मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाला होता.

पोलिसांनी मला तिच्या घराजवळ..; ऐश्वर्याच्या घराबाहेरील गोंधळानंतर जेव्हा सलमानने केला खुलासा
Salman Khan and Aishwarya Rai
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 13, 2024 | 1:27 PM

अभिनेत्री ऐश्वर्या राय सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत आहे. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या घटस्फोट घेणार असल्याचं म्हटलं जातंय. या चर्चांदरम्यान अभिषेकचं नाव अभिनेत्री निम्रत कौरशी जोडलं जातंय. अशातच सोशल मीडियावर काही जुन्या मुलाखती पुन्हा एकदा व्हायरल होत आहेत. 1999 ते 2002 दरम्यान ऐश्वर्या आणि सलमान खानचं रिलेशनशिप सर्वाधिक चर्चेत होतं. ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाच्या सेटवर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र या नात्यात अनेक वादही झाले. ऐश्वर्याने सलमानवर शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला. सध्या सोशल मीडियावर ऐश्वर्याचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार स्वीकारायला मंचावर जाते. यावेळी तिच्या हातावर जखमेची पट्टी दिसून येत आहे. डोळ्याजवळ लागलेला मार तिने गॉगलने झाकला आहे. यावर नेटकऱ्यांनी विविध कमेंट्स केल्या आहेत. ‘हे खूपच भयंकर आहे. जिच्यावर अन्याय झाला, ती सर्वकाही लपवून स्वत:चा बचाव करू पाहतेय आणि दोषी मोकळा फिरतोय. तिने सलमानला सोडलं ते बरं झालं’, असं एकाने लिहिलंय. तर ‘सलमान खानमुळे माझं रक्त खवळतंय’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय.

ऐश्वर्याचा हा जुना व्हिडीओ व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सलमानच्याही एका जुन्या मुलाखतीचा व्हिडीओ रेडिट युजरने शेअर केला. यामध्ये सलमान ऐश्वर्याच्या घराबाहेर घातलेल्या गोंधळाविषयी मोकळेपणे बोलताना दिसत आहे. 2002 मध्ये ‘बॉम्बे टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सलमान म्हणाला, “खरंय, या सर्व बातम्या खऱ्या आहेत. पण त्यात अतिशयोक्ती आहे. मी तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. पण जर तुमची भांडणं होत नसतील, तर तुमच्यात प्रेमच नाही. मी एखाद्या बाहेरच्या व्यक्तीशी भांडू शकत नाही. जी काही भांडणं किंवा अधिकार गाजवण्याची वृत्ती आहे ती माझ्याकडून आहे आणि ते सर्व प्रेमापोटी आहे. पण मी माझ्या गाडीला धडक दिली. पोलिसांनी मला तिच्या घराजवळ न जाण्याचा इशारा दिला आहे.”

2001 मध्ये सलमान रागाच्या भरात ऐश्वर्याच्या घराजवळ गेला होता आणि तिथे त्याने गोंधळ घातला होता. सलमान जोरजोरात तिच्या घराचं दार वाजवत होता, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं होतं. जर ऐश्वर्याने दार उघडलं नाही तर छप्परवरून उडी मारून घरात शिरण्याची धमकीही सलमानने दिल्याचा दावा काहींनी केला होता.