‘KGFच्या आधी यश कोण होता? या प्रश्नावर भडकली आई, थेट उत्तर देत सांगितली संघर्षाची कहाणी
'माझा मुलगा दहशतवादी नाही', साऊथ सुपरस्टार यशच्या स्टारडमवर वक्तव्य करणाऱ्यांवर भडकील यशची आई. थेट उत्तर देत सांगितली यशच्या संघर्षाची कहाणी.

साऊथ सुपरस्टार यशच्या स्टारडमची सुरुवात ‘KGF’पासून झाली असं मानणाऱ्यांना आता त्याची आई पुष्पा अरुणकुमार यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. यशची ओळख ‘KGF’मुळे निर्माण झालेली नाही तर या फ्रँचायझीपूर्वीच त्याने कन्नड चित्रपटसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण केलं होतं असं त्यांनी स्पष्ट केलं.
यशच्या आईचं हे वक्तव्य सध्या चर्चेत असलेल्या निर्माते अल्लू अरविंद यांच्या 2023 मधील जुन्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं ठरत आहे. त्यावेळी त्यांनी ‘KGFच्या आधी यश कोण होता?’ असा सवाल केला होता. आता यशच्या ‘टॉक्सिक’ चित्रपटाची चर्चा सुरू असताना हे जुने वक्तव्य पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
‘KGF आधी यशने दिले होते पाच हिट चित्रपट’
नुकत्याच झालेल्या एका प्रेस मीटमध्ये पुष्पा यांनी कोणाचंही नाव न घेता या मुद्द्यावर आपली भूमिका मांडली. त्या म्हणाल्या की, ‘KGF’पूर्वीच यश कन्नड सिनेमातील एक लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेता बनला होता. त्याने सलग पाच हिट चित्रपट दिले होते आणि त्यामुळे त्याला मिळालेलं स्टारडम एका रात्रीत मिळालेलं नाही.
जर तुमच्या मते तो कोणीच नव्हता तर मग तुम्हाला त्याची भीती का वाटते? तो काही दहशतवादी नाही. KGFच्या आधी तो कोण होता, हा प्रश्न विचारण्याची गरजच नाही. त्याने त्याआधीही चांगले चित्रपट दिले आहेत. यश हा कोणत्याही श्रीमंत कुटुंबातून आलेला नाही. तो बस ड्रायव्हरचा मुलगा असून, स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर त्याने हे यश मिळवलं आहे. मुलाच्या संघर्षाचा अभिमान असल्याचंही यशच्या आईने सांगितलं.
‘Toxic’ची बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात
दरम्यान, यशच्या ‘Toxic’ चित्रपटाचीही जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळत असल्या तरी बॉक्स ऑफिसवर त्याने चांगली सुरुवात केल्याचं सांगितलं जात आहे. प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या पाच दिवसांत चित्रपटाने भारतात 200 कोटी रुपयांचा टप्पा पार केल्याचा दावा केला जात असून, आता निर्मात्यांचे लक्ष जगभरातील 300 कोटींच्या कमाईकडे आहे.
मात्र ‘Toxic’ केवळ कमाईमुळेच चर्चेत नाही. चित्रपटातील काही सीन आणि लैंगिक आशयावरूनही सोशल मीडियावर चित्रपटाची मोठी चर्चा रंगली आहे. काही प्रेक्षकांना चित्रपटाचा हा अंदाज आवडला आहे तर काहींनी त्यावर नाराजी व्यक्त केली आहे.