मनोज जरांगेंच्या प्रकृतीबाबत चिंता वाढवणारी बातमी, रिपोर्ट दिसताच…खुद्द जरांगेंनीच व्यक्त केली शंका; काय घडलं?
मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. दरम्यान आता वैद्यकीय पथकाकडून त्यांची नियमितपणे तपासणी करण्यात येत आहे. मात्र डॉक्टरांनी जो रिपोर्ट दिला आहे, त्यावर खुद्द मनोज जरांगे पाटील यांनीच शंका उपस्थित केली आहे. पत्रकारांनीच या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावावा असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. रविवारी संध्याकाळी मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची वैद्यकीय पथकाकडून तपासणी करण्यात आली होती. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. परंतु त्यांच्या शरीरातील साखरेची पातळी कमी होण्यास सुरुवात झाली होती. मात्र आता त्यांच्या शरीरातील साखरेची पातळी झपाट्याने कमी, कधी जास्त होत असल्याचं समोर आलं आहे. यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
पत्रकारांनी सोक्षमोक्ष लावावा. पहिल्या दिवशी माझी शुगर 94 होती. दुसऱ्या दिवशी ते म्हणाले शरीरातील साखरेची पातळी 66 आहे. 94 वरून थेट 66 वर आली. त्यानंतर शुगर वाढली ती 72 झाली, 72 वरून ती 80 वर पोहोचली आहे. शुगर अचानक वाढायला कशी लागली? शुगर तर कमीच व्हायला पाहिजेना कारण मी तर कारी जागा सोडत नाही. नाहीतर तुम्हाला वाटायचं मी काहीतरी खातोय. तुम्हाला जर असं वाटत असेल की मी काही खातोय, तर मशिन आणून इथे चेक करा, असं यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
माझ्या पोटात एक जरी अन्नाचा कण आणि पाण्याचा थेंब निघाला तर तुम्ही म्हणता तिथे जीव द्यायला मी तयार आहे. अशी कोणती ही यंत्रणा आहे, हा विषय सिरियस आहे, खरंच सिरियस आहे. पत्रकारांनी याचा सोक्षमोक्ष लावायला पाहिजे, असं यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. माझी शुगर कमी व्हायला लागली तर ती कमीच व्हायला पाहिजे ना? ती अचानक वाढायला कशी लागली असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
