उष्माघाताची लक्षणे दिसल्यास ताबडतोब अवलंबा ‘या’ 5 गोष्टी, खबरदारी देखील जाणून घ्या

उन्हाळ्यात तापमान वाढल्याने वातावरणात उष्ण वारे वाहू लागतात आणि त्यामुळे उष्माघाताचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो, म्हणून आपण सर्वांनी आधीच खबरदारी घेणे आवश्यक आहे. तर आजच्या या लेखात आपण उष्माघाताची लक्षणे दिसू लागताच कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे जाणून घेऊ.

उष्माघाताची लक्षणे दिसल्यास ताबडतोब अवलंबा या 5 गोष्टी, खबरदारी देखील जाणून घ्या
| Edited By: | Updated on: Apr 12, 2025 | 3:49 PM

एप्रिल महिन्यात उष्णतेचा पारा अनेक ठिकाणी पारा 40 च्या पुढे गेला आहे. यामुळे दिवसभरात उन्हाचा कडाका वाढत आहे. वाढत्या उष्णतेमुळे उन्हाच्या झळा या सहन होत नसल्याने उष्मघाताच्या समस्या निर्माण होत आहे. अशावेळेस उष्णतेच्या लाटेपासून स्वतःचे संरक्षण करणे खूप महत्वाचे आहे. आपण सर्वांनी या उन्हाळ्यात संतुलित आहार घ्यावा, भरपूर पाणी प्यावे आणि नारळ पाणी, ताक, लिंबूपाणी, फळांचे ज्यूस इत्यादी निरोगी पेये प्यावीत. यामुळे शरीर हायड्रेट राहते. शक्य तितके कमी उन्हात बाहेर जाण्याचा प्रयत्न करावा. विशेषतः दुपारी 12 ते 3 या वेळी घरीच राहावे. कधीकधी असे असूनही उष्माघात होतो. उष्माघाताची लक्षणे दिसल्यास काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि खबरदारी घेतली पाहिजे.

जर उष्माघात झाला आणि त्याच्या लक्षणांकडे लक्ष दिले नाही तर ही स्थिती गंभीर होऊ शकते आणि थोडीशीही निष्काळजीपणा घातक ठरू शकतो. उष्माघाताची काही लक्षणे दिसून येतात, तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू नये. याबद्दल आजच्या लेखात आपण सविस्तर जाणून घेऊयात.

उष्माघाताची लक्षणे कोणती?

उष्णतेमुळे शरीराचे तापमान खूप वाढते.

जलद श्वास आणि नाडीचा वेग वाढतो.

तीव्र डोकेदुखीसह चक्कर येणे.

मळमळ आणि उलट्या होणे आणि अस्वस्थ वाटणे.

अस्वस्थ वाटल्याने स्पष्टपणे बोलता न येणे.

चेहरा लालसर पडणे.

या 5 गोष्टी ताबडतोब केल्या पाहिजेत

जर उष्माघाताची लक्षणे दिसून येत असतील तर लगेच घट्ट कपडे घातले असतील ते सैल करा किंवा हलके कपडे घाला.

गर्दीच्या ठिकाणापासुन दुर जाऊन मोकळ्या हवेशीर जागेत बसा.

थंड पाण्यात टॉवेल किंवा सुती कापड भिजवा, ते पिळून घ्या आणि शरीर पुसून घ्या.

शरीराचे तापमान कमी करण्यासाठी काखेखाली एक ओले कापड ठेवा.

उष्माघाताची लक्षणे दिसून येत असतील तर थोडा आराम करा. त्यानंतर नारळ पाणी किंवा ज्यूस यासारखे आरोग्यदायी पेय प्या.

ही खबरदारी घेणे महत्वाचे

उष्माघात झाल्यास घरगुती उपचारांसह ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा.

उष्माघात झाल्यास ताबडतोब खूप थंड ठिकाणी नेऊ नका. अशा ठिकाणी बसवा जिथे तापमान खूप गरम किंवा खूप थंड नसेल.

जर उष्माघाताची लक्षणे आढळली तर लगेच खूप थंड पाणी पिण्याची चूक करू नका.

उष्माघात झाल्यास लगेच आंघोळ करण्याची चूक करू नये, अन्यथा स्थिती आणखी बिकट होऊ शकते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us