West Bengal Result : पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या विजयाने बांग्लादेशचे धाबे दणाणले, वरवर म्हणतात फरक पडला नाही, पण..
West Bengal Election Result : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला. भाजपने एक ऐतिहासिक यश मिळवलं. पहिल्यांदा ते बंगालमध्ये सत्तेवर आले. भाजपच्या या विजयामुळे बांग्लादेशातील नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यांच्या प्रतिक्रियेमधून ते दिसतय.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत काल भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला. ममता बॅनर्जी यांचा दारुण पराभव झाला. त्या स्वत:च्या भवानीपूर विधानसभा मतदारसंघातही सुवेंदू अधिकारी यांच्याकडून पराभूत झाल्या. भाजपच्या या बंगाल विजयाची शेजारच्या बांग्लादेशातही चर्चा आहे. तिथल्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात पश्चिम बंगालमधल्या या बदलाबद्दल बोललं जातय. बांग्लादेशच्या राजकारणात पश्चिम बंगालमधल्या सत्ता बदलाची चर्चा होणं स्वाभाविक आहे. बांग्लादेशच्या सोशल मीडियावर या निकालाबद्दल चिंता आणि अपेक्षा अशा समिश्र भावना आहेत. सोशल मीडियावर याकडे मुस्लिम राजकारणातील मोठा बदल म्हणून पाहिलं जात आहे.
“भारताबद्दलचं जे आमचं परराष्ट्र धोरण आहे, त्यावर पश्चिम बंगाल निवडणूक निकालाचा काहीही परिणाम होणार नाही. ‘बांग्लादेश फर्स्ट’ ही आमची निती आहे. दुसऱ्या देशात कुठल्याही पक्षाचं सरकार असो, त्यामुळे आमचं परराष्ट्र धोरण बदलत नाही” अशी बांग्लादेशच्या परराष्ट्र राज्य मंत्री शमा ओबैद इस्लाम यांनी प्रतिक्रिया दिली. “पश्चिम बंगालच्या निवडणुकीशी बीएनपीचं काही देणं-घेणं नाहीय. निवडणूक भारतात झाली. हा भारताचा अंतर्गत विषय आहे. त्यांच्या लोकशाहीशी संबंधित आहे. आमच्या मते आमच्या देशात लोकशाही असली पाहिजे. भारतासह सर्व शेजारी देशात लोकशाही मजबूत झाली पाहिजे” असं शमा पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या.
कंगलू एक अपमानास्पद शब्द
बांग्लादेश सरकारने कितीही म्हणू दे या विजयामुळे फरक पडणार नाही. पण सत्य हे आहे की, पश्चिम बंगालमधील भाजपच्या विजयामुळे बांग्लादेशी नेते आणि एक्सपर्ट चिंतेमध्ये आहेत. अलीकडेच बांग्लादेश नॅशनल सिटीजन पार्टीचे सचिव अख्तर हुसैन यांनी संसदेत पश्चिम बंगाल निवडणुकीबद्दल चिंता व्यक्त केली होती. पश्चिम बंगालमध्ये भाजप जिंकल्यास बांग्लादेशात मोठं संकट निर्माण होईल असं ते म्हणाले होते. ते घुसखोरांना पुन्हा बांग्लादेशात पाठवून देतील. त्यामुळे आमच्या इथे शरणार्थीच संकट निर्माण होईल. याबद्दल अख्तर हुसैन यांनी चिंता व्यक्त केलेली. कंगलू एक अपमानास्पद शब्द आहे. बांग्लादेशात बेकायद मुस्लिम घुसखोरांसाठी हा शब्द वापरला जातो.
कुठल्या जिल्ह्यातील मतदारांची नावं कापली?
भारतात बांग्लादेशी घुसखोर हा मोठा राजकीय मुद्दा आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपने हा मुद्दा लावून धरला होता. आपल्या राजकीय हितासाठी बेकायद घुसखोरांना ममता बॅनर्जी आश्रय देतात, असा आरोप भाजपकडून सातत्याने करण्यात आला. निवडणूक आयोगाने SIR लागू केल्यानंतर 90 लाख लोकांची नावं कापली. बेकायदरित्या येऊन पश्चिम बंगालमध्ये राहणारे तिथल्या मतदार यादीत नाव असलेले लोक SIR मध्ये जास्त असू शकतात. बांग्लादेशला लागून असलेल्या कूचबिहार, जलपाईगुडी आणि अलीपुरद्वार सारख्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मतदारांची नावं कापण्यात आली.