भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला, तीन घटनांमध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू
Maharashtra Accident : अमरावती, जालना आणि जळगावमध्ये झालेल्या अपघातांमध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

राज्यात आज 3 वेगवेगळ्या ठिकाणी अपघात झाले असून यात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अमरावती, जालना आणि जळगावमध्ये झालेल्या अपघातांमध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आहे. अमरावतीच्या सावर्डीजवळ झालेल्या भीषण अपघातात भरधाव ट्रकने कामगारांना चिरडले. रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू असताना अपघात झाला. यात तिघांचा मृत्यू झाला आहे.
अमरावतीत तिघांचा मृत्यू
अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर सावर्डी नजीक असलेल्या रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ झालेल्या भीषण अपघातात ट्रक चालकासह तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले. महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू असताना हा भीषण अपघात घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आयआरबी कंपनीच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावर खड्डे बुजविण्याचे काम सुरू होते. भरधाव ट्रक अचानक अनियंत्रित होऊन उभ्या ट्रकवर जोरदार आदळला. धडकेनंतर ट्रकने रस्त्यावर काम करणाऱ्या कामगारांनाही फरफटत नेले. या भीषण अपघातात ट्रक चालक शिवचंद श्रीराम पाल, याच्यासह मुकुंदराव गणोरकर आणि देविदास पाटील यांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहे
जालन्यात महिलेचा चिरडून मृत्यू
जालना ते छत्रपती संभाजीनगर या मुख्य महामार्गावर बदनापूर तालुक्यातल्या वरुडी परिसरात असलेल्या नूर हॉस्पिटल जवळ आज दुपारच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकीवर असलेल्या महिलेचा ट्रकच्या चाकाखाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात तिचा पती गंभीर जखमी झाला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर कडून जालन्याच्या दिशेने भरधाव वेगात ट्रक जात होता आणि त्याच वेळी हे पती-पत्नी आपल्या दुचाकीवरून बदनापूरच्या दिशेने येत होते. मात्र वरुडी जवळ येताच पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकच्या चाकखाली पत्नी चिरडल्या गेली. तिचा पती गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
जळगावात महिलेचा मृत्यू
जळगावामध्ये भरधाव भरधाव टँकरने दुचाकीला मागून दिलेल्या धडकेत भाजीपाला विक्रेत्या महिलेचा जागीच मृत्यू झाला असून मुलगा गंभीर जखमी झाला आहे. राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल दिल्ली दरबारच्या विरुद्ध बाजूला ही अपघाताची घटना घडली असून नागरिकांनी टँकर चालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
मंगला अर्जुन माळी असे मयत 55 वर्षीय महिलेचे नाव असून त्यांचा 25 वर्षे मुलगा भरत माळी अपघातात गंभीर जखमी झाला आहे. सिमेंटचा रस्ता तयार करण्यासाठी खरडून ठेवलेल्या मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गाने हा बळी घेतल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
