अगोदर वटारले डोळे, आता आला काकुळतीला, बांगलादेशाने भारताचा दरवाजा का ठोठावला ?
बांगलादेशने भारताकडे अतिरिक्त डिझेल पुरवठ्याची विनंती केली आहे, ज्यांनी यापूर्वी शेख हसीना यांच्या कार्यक्रमावरून नाराजी व्यक्त केली होती. इंधन टंचाईमुळे देशात वीज कपात होत असल्याने बांगलादेशने भारतासोबत ऊर्जा सहकार्य वाढवण्याचे संकेत दिले आहेत.

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या पत्रकार परिषदेला भारताने परवानगी दिल्याबद्दल बांगलादेशने नाराजी व्यक्त केली होती. त्यावरून कडक इशाराबी देण्यात आला होता. मात्र त्याच बांगलादेशने आता इंधनटंचाईच्या पार्श्वभूमीवर भारताकडे अतिरिक्त डिझेल पुरवठ्याची विनंती केली आहे. शेजारील देशाच्या या यू-टर्नमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र या मागणीवर भारत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. शेख हसीना यांच्या कार्यक्रमाला परवानगी दिल्यास द्विपक्षीय संबंधांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो असा इशारा यापूर्वी बांगलादेशने दिला होता.
दरम्यान, भारतीय राजनैतिक अधिकारी दिनेश त्रिवेदी यांनी बांगलादेशचे ऊर्जा मंत्री इकबाल हसन महमूद यांची नुकतीच भेट घेतली होती. भारतीय उच्चायोगाच्या माहितीनुसार, या बैठकीत ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य अधिक बळकट करण्याबरोबरच भारत-बांग्लादेश सीमापार वीज आणि ऊर्जा जोडणी विस्तारण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.
डिझेलच्या कमतरतेची कबुली
या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना बांगलादेशचे मंत्री महमूद यांनी देशातील डिझेल टंचाईमुळे गॅसवर आधारित वीजनिर्मितीवर परिणाम झाल्याचे मान्य केलं होतं. त्यामुळे अनेक भागांत वीज कपात करावी लागत असल्याचं त्यांनी सांगितलं. “भारताशी जोडलेल्या पाइपलाइनद्वारे आम्हाला डिझेलचा पुरवठा होतो. सध्याची कमतरता लक्षात घेऊन आम्ही भारताला अतिरिक्त डिझेल पुरवठ्याची विनंती केली आहे” असं ते म्हणाले. भारताकडून वाढीव डिझेल मिळाल्यास देशातील इंधनटंचाई कमी होण्यास मदत होईल, असंही त्यांनी नमूद केलं. “भारत हा आमचा शेजारी देश असून दोन्ही देशांचे अनेक समान हितसंबंध आहेत. त्याच अनुषंगाने या विषयावर चर्चा झाली,” असेही त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे, मार्च आणि एप्रिल महिन्यांत बांग्लादेशने याच पाइपलाइनद्वारे सुमारे ३० हजार टन डिझेलची आयात केली होती.
शेख हसीना यांच्या कार्यक्रमावर तीव्र आक्षेप
दरम्यान नवी दिल्लीत शेख हसीना यांना माध्यमांशी थेट संवाद साधण्याची परवानगी दिल्याबद्दल सरकारने तीव्र नाराजी व्यक्त केली. बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात हे नमूद केलं होतं. या निवेदनानुसार, या कार्यक्रमात शेख हसीना आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बांगलालादेश व तेथील नागरिकांविषयी आक्षेपार्ह आणि भडकाऊ वक्तव्यं केली. या कार्यक्रमामुळे दोन्ही देशांतील संबंध सुधारण्याच्या प्रयत्नांवर विपरीत परिणाम होऊ शकतो, याची माहिती भारत सरकारला आधीच देण्यात आली होती, असा दावा मंत्रालयाने केला. तरीही कार्यक्रमास परवानगी देण्यात आल्याबद्दल बांग्लादेशने नाराजी व्यक्त केली.
‘जुलै क्रांती’च्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय भूमीवर शेख हसीना यांचा कार्यक्रम आयोजित होणं, हे बांग्लादेशच्या सार्वभौमत्वाचा अपमान असून, त्या आंदोलनातील शहीदांचा अवमान असल्याचे सरकारचे मत आहे, असं निवेदनात म्हटलं होतं.
दरम्यान, कोणतीही किंमत मोजावी लागली तरी यावर्षाअखेरीस बांग्लादेशात परतणार असा निर्धार शेख हसीना यांनी दिल्लीतील कार्यक्रमात व्यक्त केला होता.