
टॅरिफच्या मुद्यावरून भारत आणि अमेरिकेतील संबंध तणावात आहेत. टॅरिफमुळे दोन्ही देशांच्या व्यापारावर मोठा परिणाम झाला. भारतावर 50 टक्के टॅरिफ अमेरिकेने लावल्याने सर्वांनाच धक्का बसला. आता भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार करार लवकरच होणार आहे. दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू असून अंतिम टप्प्यात निर्णय असल्याचे स्वत:
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. यासोबतच भारताला मोठा दिलासा मिळण्याचेही स्पष्ट संकेत आहेत. भारत आपल्या म्हणण्यावर ठाम असल्याचेही सांगितले जातंय. अमेरिकेने मोठा निर्णय घेत चीनवरील टॅरिफ कमी केलाय. भारतावरीलही टॅरिफ कमी होण्याचे स्पष्ट संकेत आहेत. यामुळे भारतीय व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे दिसतंय.
रिपोर्टनुसार, भारत अमेरिकेच्या व्यापार चर्चेत जवळपास सर्वच मुद्द्यांवर एकमत झालंय. डोनाल्ड ट्रम्प यांनीही म्हटले आहे की, दोन्ही देश व्यापार करार करण्याच्या एकदम जवळ पोहोचली आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच भारताचे वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी म्हटले की, पुढचा महिना कराराच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा असेल. भारत आणि अमेरिकेमध्ये व्यापार करार यशस्वी झाला तर टॅरिफमध्ये मोठी कपात केली जाईल.
मिळालेल्या माहितीनुसार, भारत आणि अमेरिकेत व्यापार करार झाले तर 50 टक्क्याहून 15 ते 16 टक्क्यांवर टॅरिफ येईल. ज्यामुळे अमेरिकेत होणारी निर्यात पुर्वीप्रमाणे होईल आणि नुकसान देखील होणार नाही. अमेरिकेचे म्हणणे आहे की, भारताने रशियाकडून तेल आयात कमी करायला हवी, त्यावर देखील सध्या चर्चा सुरू असल्याची माहिती मिळतंय. भारताने अमेरिकेला विश्वास दर्शवला आहे की, भारत हळूहळू करून रशियाकडून कच्च्या तेलाची आयात कमी करेल.
भारताला कृषी आणि दुग्ध उद्योगात अमेरिकेचा प्रवेश नको आहे. कारण भारत हा कृषी प्रधान देश असल्याने अमेरिकेचे उत्पादन भारतीय बाजारपेठेत दाखल झाले तर येथील शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते. भारताला खात्री करायची आहे की, या करारामुळे त्याच्या स्थानिक उद्योगांना फायदा होईल. जर दोन्ही देशांमधील हे करार यशस्वी झाले तर याचा फायदा भारताला मोठ्या प्रमाणात होईल आणि थेट टॅरिफ कमी होईल.