
मध्य पूर्वेत मोठा तणाव बघायला मिळत आहे. 28 फेब्रुवारी 2026 पासून युद्धाला सुरूवात झाली. अमेरिका आणि इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर इराणकडून थेट होर्मुज खाडी बंद करण्यात आली. होर्मुज खाडीत जहाजांचे मोठे जाम लागले. भारतासह अन्य देशांचे जहाज अडकून पडले. होर्मुज खाडीत भारताचे 20 जहाज अडकले. भारत सरकारने चर्चा केल्यानंतर भारताच्या काही जहाजांना सुरक्षित रस्ता देण्यात आला. भारतात होर्मुज मार्गेच कच्चे तेल आणि एलपीजी गॅस पोहोचतो. हाच मार्ग बंद असल्याने भारतात एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला. यादरम्यानच आता भारतासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. नुकताच इराणकडून अत्यंत मोठी घोषणा करण्यात आली. इराणकडून सुरूवातीपासूनच सांगितले जात आहे की, होर्मुज खाडी पूर्णपणे बंद नाहीये.
ज्यावेळी अमेरिकेने ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला करण्याची धमकी दिली. त्यावेळी इराणकडून थेट पूर्णपणे होर्मुज खाडी बंद करण्याची धमकी दिली आणि थेट अमेरिकेने पाच दिवसांकरिता युद्धबंदी जाहीर केली. इराणचे विदेश मंत्री अब्बास अराघची यांनी म्हटले की, आम्ही आमच्या जवळच्या मित्र पाच देशांकरिता होर्मुज खाडी खुली केली आहे आणि होर्मुज खाडी पूर्णपणे बंद नाहीये.
आम्ही मित्र पाच देशांना होर्मुज खाडीतून सुरक्षित रस्ता देत आहोत. अराघची यांनी म्हटले की, भारत, रशिया, चीन, इराक आणि पाकिस्तान या देशांना आम्ही होर्मुज खाडी वापरण्याची परवानगी दिली आहे आणि त्या देशाचे जहाज सुरक्षित होर्मुज खाडीतून प्रवास करत आहेत. होर्मुज खाडी फक्त अशा देशांकरिता बंद आहे, जे आमचे शत्रू देश आहेत आणि शत्रू देशांना मदत करणाऱ्या देशांकरिताही होर्मुज खाडी बंद आहे.
बऱ्याच देशांनी आम्हाला संपर्क केला आणि त्यांच्या जहाजांना सुरक्षित मार्ग देण्याची विनंती केली. आम्ही ज्यांना मित्र मानतो अशा देशांना आम्ही होर्मुज खाडीतून सुरक्षित रस्ता देत आहोत. हेच नाही तर अब्बास अराघची यांनी हे देखील स्पष्ट केले की, अमेरिकेसोबत त्यांची कोणतीही चर्चा अद्याप झालेली नाही.