
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. या युद्धाचे पडसाद आता मध्य-पूर्व आशियापर्यंत मर्यादित न राहता आता जगभरात पडताना दिसत आहे. या युद्घाचा फटका जागतिक अर्थकारणासह महाराष्ट्रालाही बसू लागला आहे. या युद्धामुळे आखाती देशांतील विमानतळ आणि बंदरे बंद करण्यात आली आहेत. याचाच परिणाम महाराष्ट्रातील निर्यातीला, पर्यटनाला आणि जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठा साखळीला बसला आहे. यामुळे अनेक व्यवहार ठप्प झाले असून कोट्यवधींचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. या अनिश्चिततेचा परिणाम मुंबईतील बाजारपेठेवरही पाहायला मिळत आहे.
पुणे शहर हे शिक्षणाचे माहेरघर असल्याने येथे मोठ्या संख्येने इराणी विद्यार्थी वास्तव्यास आहेत. युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी विशेष पावले उचलली आहेत. पुणे शहरातील धार्मिक स्थळे, गजबजलेली ठिकाणे आणि संवेदनशील केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच पुणे पोलिसांच्या विशेष शाखेने (Special Branch) शहरातील इराणी विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांना धीर दिला आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या व्हिसाची मुदत संपत आली आहे, त्यांना ती वाढवून देण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून सहकार्य केले जाणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.
नाशिक जिल्हा हा द्राक्ष आणि कांद्याचा मुख्य उत्पादक आहे. मात्र, दुबईतील बंदर व्यवहार ठप्प झाल्याने निर्यातीला ब्रेक लागला आहे. इराण-इस्रायल संघर्षामुळे दुबईत कोरोना सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे तेथील विमानतळ आणि बंदरे बंद करण्यात आली आहेत. रमजानच्या काळात द्राक्ष आणि कांद्याला मोठी मागणी असते. पण युद्धामुळे निर्यात थांबल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. तसेच दुबईमध्ये भारतीय शेतमालाचे दर एका रात्रीत तिप्पट वाढले आहेत, मात्र पुरवठा साखळी तुटल्याने निर्यातदारांना याचा फायदा घेता येत नसल्याचे पाहायला मिळत आहे.
इराण इस्त्रायल युद्धामुळे विमानसेवा विस्कळीत झाली आहे. याचा पर्यटनालाही मोठा फटका बसला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील सुमारे १५० पर्यटक सध्या दुबईत अडकून पडले आहेत. उड्डाणे रद्द झाल्याने त्यांच्या परतीचा प्रश्न गंभीर झाला आहे. तसेच पुण्याहून आखाती देशांत जाणारी सर्व विमाने रद्द करण्यात आली आहेत, ज्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
मुंबईतील घाऊक बाजारपेठेत सुक्या मेव्याच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. वाशी एपीएमसी आणि क्रॉफर्ड मार्केटमध्ये बदमाचे दर १,८०० वरून २,८०० रुपयांवर पोहोचला आहे, तर ‘इराणी पिस्ता’ ८४० वरून १,३०० रुपयांपर्यंत महागला आहे. अफगाणिस्तानचा माल इराणमार्गे भारतात येतो, तो मार्ग बंद झाल्याने भविष्यात सुक्या मेव्याचा मोठा तुटवडा निर्माण होऊ शकतो. तसेच जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती १० टक्क्यांनी वाढल्या आहेत. मुंबईत सध्या पेट्रोल १०३.५० रुपये प्रति लिटर असले तरी, युद्ध लांबल्यास दरवाढ अटळ मानली जात आहे.